काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता लवकरच अक्षयचे ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘पृथ्वीराज’ हे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान चित्रपट प्रदर्शक अक्षय राठीने ट्विट करत इतर कलाकारांना देखील अक्षय प्रमाणे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विट करत हे योग्य नाही असे म्हटले आहे.

अक्षय राठीने अक्षयचा उल्लेख करत केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे. ‘अक्षय कुमार जितक्या वेळामध्ये एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करतो तितक्या वेळात अनेक कलाकारांना छोटे सीन किंवा इतर काही गोष्टी शिकण्यात जातो. हे खूप आश्चर्यकारक आहे. अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरतात. इतर कलाकारांनी देखील योग्य नियोजन करावे’ या आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

अक्षयच्या या ट्विटवर अभिषेकने उत्तर देत नाराजी व्यक्त केली आहे. ‘हे योग्य नाही. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती वेगळ्या गोष्टींमुळे प्रेरित होतो. आणि एखादे काम करण्याचा वेग प्रत्येकाचा वेगळा असतो’ या आशयाचे ट्विट अभिषेकने केले आहे.

त्यानंतर अक्षयने अभिषेकला उत्तर दिले आहे. अक्षय आणि अभिषेकमध्ये ट्विटरवर वाद सुरुच होता.