'जुने ते सोने' या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्य कलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी त्या पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटतात. म्हणून कदाचित असंच एक गाजलेलं लोकप्रिय नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेल्या आणि डॉ. श्रीराम लागू ,शांता जोग, अशोक सराफ या कलाकारांच्या उत्तम अभिनयाच्या अदाकारीने गाजलेल्या ‘हिमालयाची सावली' हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या नाटकाची जबाबदारी राजेश देशपांडे यांनी घेतली असून ते 'हिमालयाची सावली'चं दिग्दर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता शरद पोंक्षे पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शरद पोंक्षे मनोरंजनसृष्टीतून लांब गेले होते. त्यांचा अचानकपणे कलाविश्वातील वावर असा कमी झाल्यामुळे चाहत्यांना प्रश्न अनेकांना पडले होते. मात्र डिसेंबरपासून कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे त्यांना कलाविश्वापासून दूर जावं लागलं होतं. मात्र या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते 'हिमालयाची सावली' या नाटकातून रंगमंचावर येणार आहेत. 'हिमालयाची सावली'मध्ये शरद पोंक्षे हे नाना साहेबांची भूमिका साकारणार आहेत. ४० वर्षांपूर्वी ही भूमिका श्रीराम लागू यांनी साकारली होती. दरम्यान, तब्बल ४० वर्षांनी रंगभूमीवर येणाऱ्या 'हिमालयाची सावली' या नाटकाची निर्मिती प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स यांनी केली आहे. एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं अशा आशयाच हे नाटक जुन्या-नव्या पिढीसाठी ही नाटय़ मेजवानी ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.