संजय लीला भन्साळीच्या ‘गुजारीश’नंतर ऐश्वर्या राय-बच्चन संसार ‘आराध्या’त रमली. त्यानंतर ऐश्वर्या अमूक चित्रपटातून परतणार सारख्या बातम्या आल्या, पण प्रत्येकवेळी तिने आपल्या पुनरागमनाबद्दल नकारघंटा वाजवली. यावेळी दाक्षिणात्य दिग्दर्शक पी. वासू यांनी स्वत:च आपल्या आगामी चित्रपटासाठी ऐश्वर्याचे नाव निश्चित झाल्याचे जाहीर केले. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी चित्रपटाचे अ‍ॅनिमेटेड संकल्पचित्रसुध्दा प्रदर्शित केले असून त्यात ऐश्वर्याचा चेहरा पहायला मिळतो.
गेली दोन वर्ष ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार, असे म्हटले जात होते. मात्र, ऐश्वर्याने आपण मणिरत्नमचा चित्रपट करत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर, तिने जाहिरातींना प्राधान्य दिले होते. आताही पी. वासू यांनी जाहीर घोषणा केली असली तरी ऐश्वर्याने याबाबतीत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘चंद्रमुखी’सारखा हिट दाक्षिणात्य चित्रपट देणाऱ्या पी. वासू यांनी आपला आगामी चित्रपट ‘कलारी’ या लढवय्या जमातीवर बेतला असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. केरळातील ‘कलारीपट्टायू’ नावाने प्रसिध्द असणाऱ्या या लढवय्या जमातीभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली असून ऐश्वर्या स्वत: ‘कलारी’ म्हणून दिसणार आहे. आत्तापर्यंत ऐश्वर्याने अशी भूमिका केलेली नाही.