‘बिग बॉस’चे प्रत्येक पर्व सलमान खानने गाजवले. सलमान आणि ‘बिग बॉस’ हे मनोरंजनाचे समीक रणच बनले आहे. मात्र, सलमाननेच पुढचे पर्व करायला नकार दिल्याने निर्मात्यांनी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला होता. ‘बिग बॉस’ हा शोच मुळी आता ‘कलर्स’ वाहिनीकडून ‘लाईफ ओके’च्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे नव्या वाहिनीबरोबर नवा सूत्रसंचालकही येणार असल्याची चर्चा आहे. या पर्वात सलमान खानऐवजी ‘बिग बॉस’चा बॉस म्हणून ‘सिंघम’ अजय देवगण सूत्रे हातात घेणार असल्याचे समजते.
‘बिग बॉस’चे गेल्यावर्षीचं पर्व अनके नाटय़पूर्ण घटनांनी भरलेले होते. म्हणजे तशी भांडणे, नाटकं हा शोचा जीवच असला तरी यावेळी घरातील सदस्यांकडून थेट निर्माते आणि सलमान खानवरच बोट ठेवले गेले. त्यांच्याशी वाद घातले गेले. गौहर-कुशाल आणि तनिषा भांडणात सलमानने तनिषाची बाजू घेतली, असा थेट आरोप गौहरने केला. किंबहुना, प्रेक्षकांनीही सलमानने पक्षपातीपणा केल्याचे जाहीरपणे सोशल कम्युनिटी साईट्सवर बोलून दाखवले. यामुळे दुखावलेल्या सलमानने पुढचे पर्व करायला नकार दिला आहे. खरेतर, सलमानने शोमध्येच आपण यापुढे हा शो करणार नाही, असे जाहीर केले होते. वास्तवातही त्याने आपली नकारघंटा कायम ठेवल्याने निर्मात्यांनी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला.
‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वासाठी आधी रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांना विचारणा झाली होती.
पण, त्यांच्याकडून थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अजय देवगणला विचारणा करण्यात आल्याचे समजते. अजयने यावर ‘मी अजून काहीही सांगू शकत नाही.
मी या शोमध्ये असेनही..नसेनही’ असे गोलमटोल उत्तर दिले आहे. मात्र, सलमानने या शोला अमाप लोकप्रियता मिळवून दिली आहे. शोचा सूत्रसंचालक म्हणून तेवढी लोकप्रियता मिळवून देणे अवघड आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे अजयने यावेळी बोलताना सांगितले.