‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट भल्याभल्यांची ओळख पुसून टाकणार असंच चित्र सगळीकडे दिसतंय. अभिजीत देशपांडे, गुरू ठाकूर आणि प्रशांत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या कडक संवादांनी आणि अभिनयाने नटलेल्या या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यामुळे सगळीकडे चित्रपटातील संवादाचीच हवा दिसत आहे. मराठी रंगभूमीवरच्या पहिल्या-वहिल्या सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांचे कलाप्रेम उलगडणारा हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमधून गर्दी खेचतो आहे. या चित्रपटाच्या यशाने यशराज प्रॉडक्शनच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या नाकीनऊ आणले असून पहिल्यांदाच या मराठी चित्रपटामुळे आमिर खान आणि अमिताभ बच्चन या मातब्बरांचा चित्रपट आठवडय़ाभरातच चित्रपटगृहांमधून उतरवावा लागला आहे.

यशराजची निर्मिती तसेच अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ अशी जबरदस्त परिणामकारक नावे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्रित आली होती. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. नंतर मात्र प्रेक्षकांच्या नाराजीचा सूर परिणामकारक ठरला. तीन दिवसांत या चित्रपटाने केलेल्या कमाईने अनेक विक्रम मोडले असले तरी त्यामागचे कारण हे त्यांच्या चढय़ा तिकीटदरांत होते. त्याच वेळी प्रदर्शित झालेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला यशराजच्या वितरणनीतीमुळे तुलनेने फारच कमी खेळ मिळाले होते, मात्र हा चित्रपट प्रेक्षकपसंतीस उतरल्याने त्याचे खेळ वाढवण्याची मागणी झाली. त्याच वेळी ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या प्रेक्षकसंख्येला उतरती कळा लागल्याने साहजिकच या बिग बजेट चित्रपटाचे खेळ अनेक चित्रपटगृहांमधून कमी झाले.

यामुळे पुन्हा दमदार आशय आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयामुळे मराठी चित्रपटाचं नाणं खणखणीत वाजतंय, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबईसह उपनगरांतील चित्रपटगृहांमध्ये ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचे शो टाइम वाढवण्यात आले असून राज्य आणि देशभरातून या चित्रपटाचे एकूण सहा हजार शो दिवसाला सुरू आहेत. याआधीही जूनमध्ये ‘मुरांबा’ चित्रपट चालत असूनही ‘टय़ूबलाइट’ चित्रपटासाठी त्याचे खेळ कमी केले जाणार होते. मात्र ‘टय़ूबलाइट’ आपटला आणि ‘मुरांबा’चे खेळ सगळ्याच मल्टिप्लेक्समधून वाढवण्यात आले.

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ने आतापर्यंत २२६ कोटींची कमाई केली असून त्याची प्रेक्षक संख्या या आठवडय़ात आणखी कमी होईल असा अंदाज ट्रेड विश्लेषकांनी वर्तवला आहे. दिवाळीला ८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांना शुक्रवारी १६ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचेही आव्हान आहे. परंतु ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाने एकदम ‘कडक’ कामगिरी केली आहे. या आठवडय़ात बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक विनोद काप्री यांचा ‘पिहू’ चित्रपट आणि सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर मराठीत ‘नाळ’, ‘एक सांगायचंय.. अनसेड हार्मनी’, ‘गॅटमॅट’ या चित्रपटांसह अन्य पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हिंदी बिग बजेट आणि मराठी चित्रपटांचा हा सामना पुढचे दोन-तीन महिने असाच सुरू राहणार आहे.

हिंदी चित्रपटांसमोर मराठी चित्रपट तग धरणार का, यावर अनेक चर्चा झडल्या आहेत. मात्र आशयघन, दर्जेदार मराठी चित्रपट हिंदीला वरचढ ठरू शकतात, याचा अनुभव बॉलीवूड कलाकारांनी याआधीही घेतला आहे. आणि आताही त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे पुढच्या हिंदी चित्रपटांसाठी सावध पावलं टाकली जात आहेत. एरवी बॉलीवूडमध्ये वर्षभर आधी खान मंडळी आणि बडे स्टार चित्रपटाच्या तारखा जाहीर करतात. आणि प्रादेशिक चित्रपटांना आपल्या वेळा त्यानुसार ठरवाव्या लागत. पण आता हे चित्र बदलतं आहे. कारण प्रादेशिक चित्रपटांना खासकरून मराठी चित्रपटांना बॉलीवूडचं आव्हान नेहमी असतंच. आता हे आव्हान ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाने मोडीत काढलं आहे.

पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणारे मराठी चित्रपटही तितकेच दमदार आहेत. या शुक्रवारी प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’, स्वप्निल जोशी-मुक्ता बर्वे जोडीचा हिट ‘मुंबई पुणे मुंबई ३’ (७ डिसेंबर), रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला ‘माऊली’ (१४ डिसेंबर), ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ (४ जानेवारी), ‘ठाकरे’ (२५ जानेवारी), ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटांनी मराठी चित्रपटांचं अवकाश विस्तारणार आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांना जपून पावलं टाकावी लागणार आहेत. अगदी नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘झीरो’साठी खुद्द शाहरुख खानने ‘माऊली’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधी घेण्याची विनंती अभिनेता रितेश देशमुखला केली होती. त्यानेही मोठय़ा मनाने आपल्या चित्रपटाची तारीख बदलली. याबद्दल किंग खानने त्याचे समाजमाध्यमांवरून आभारही मानले. पुढच्या दोन महिन्यांत ‘झीरो’, ‘२.०’ आणि ‘सिम्बा’ या हिंदी चित्रपटांना मराठी चित्रपटांचं तगडं आव्हान असणार आहे.