बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा आगामी चित्रपट ‘रेस ३’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनिल कपूर चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या साऱ्यामध्ये त्याला भाईजान सलमानचीही साथ मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चित्रपटातील कलाकारांनी नुकतीच ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी अनिल कपूरने शो  सुरु असताना एका कारणामुळे जाहीर माफी मागितली. त्यामुळे ‘दस का दम’चा हा भाग चांगलाच चर्चेत आला आहे.

‘दस का दम’ या शोच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर परतला असून तो या शोचे सूत्रसंचालन करत आहे.  त्यातच ‘रेस ३’  प्रदर्शनासाठी सज्ज झाल्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. प्रमोशनचाच एक भाग म्हणून या टीमने  ‘दस का दम’च्या सेटवर हजर लावली होती. यावेळी सलमानने शोच्या नियमानुसार या टीमला एक प्रश्न विचारला.

‘असे किती भारतीय व्यक्ती आहेत जे आपल्या आईला दिवसातून एकदा तरी फोन करतात’ असा प्रश्न सलमानने ‘रेस ३’ च्या टीमला विचारला. हा प्रश्न ऐकताच प्रत्येकाने आपआपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिल कपूरने प्रश्नाचे उत्तर वेगळ्या स्वरुपात दिले.  ‘मला इतर व्यक्तींचं माहित नाही. पण मी मात्र माझ्या आईला एकदाही फोन करत नाही. अगदी इतकचं नाही तर मी साधा तिला वेळही देऊ शकत नाही’ असं अनिलने सांगितलं.

‘मी माझ्या आईला वेळ देत नाही ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. मी आज सर्वांसमक्ष माझ्या आईची मनापासून माफी मागतो”, असं म्हणत अनिलने खेद व्यक्त केला आणि आईची जाहीर माफी मागितली.

दरम्यान, ‘दस का दम’ हा शो पहिल्या दिवसापासून प्रचंड गाजत असून पहिल्याच भागामध्ये एका स्पर्धकाने सलमानला प्रश्न विचारला होता या प्रश्नाचं उत्तर सलमानने ज्या पद्धतीने दिलं होतं ते पाहून सर्वांमध्ये एकच हाशा पिकला होता .तर दुस-या भागात सलमानने एका स्पर्धकाच्या मुलीची शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे या शोचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असून हा शो पुढे आणखी रंगतदार होईल असं एकंदरीत दिसून येत आहे.