१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. न्यायालयाच्या या निर्णयावर काही बॉलिवूड कलाकारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बाबरी मस्जिद ख़ुद ही गिर गया था। — Swara Bhasker (@ReallySwara) September 30, 2020 अभिनेत्री स्वरा भास्कर हिने "..तर बाबरी मशीद स्वत:चं खाली पडली होती" असं उपरोधिक ट्विट केलं. तसेच गौहर खान हिने "भूकंपामुळे मशीद पडली होती का?" असा सवाल केला आहे. काही बॉलिवूड कलाकारांच्या या उपरोधिक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. But ofcourse !it was an earthquake! Hahahhaha . The joke is on us ! — Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) September 30, 2020 या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. इस जगह से ऊपर भी एक अदालत है, यहां देर है अंधेर नहीं। — TheRichaChadha (@RichaChadha) September 30, 2020 न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.