‘बाहुबली २’ सिनेमा हिट होणार होता याची खात्री सर्वांनाच होती. पण तो एवढं यश संपादन करेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर मिळवायला गेलेले प्रेक्षक पुनःपुन्हा चित्रपटगृहात जात आहेत. ‘बाहुबली’ची व्यक्तिरेखा साकारणारा प्रभास दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. प्रभासबद्दलच्या सर्वच लहान मोठ्या गोष्टी जाणून घेण्यास त्याचे चाहते उत्सुक असतात. पण ‘बाहुबली’ला जेवढं जास्त यश मिळतंय, तेवढाच हैराण प्रभासही होतोय. झोप न मिळाल्याने त्याला त्रास होऊ लागला आहे.

शुक्रवारी २८ तारखेला ‘बाहुबली-२’ जगभरातील तब्बल ९ हजार स्क्रीनवर प्रदर्शि झाला आणि भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला गेला. ‘बाहुबली २’ बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत असताना प्रभासच्या मात्र नाकी नऊ आलेत. ‘बाहुबली’वर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा, शुभेच्छांचा, कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळे शुभेच्छा द्यायला प्रभासचा मोबाइल सतत खणखणतोय, मेसेजचा पाऊस पडतोय. त्यातील जास्तीत जास्त फोन घेण्याचा, मेसेजना रिप्लाय करण्याचा प्रयत्न प्रभास करतोय. त्यात तो इतका गढला की त्याला पुरेशी झोपच घेता येत नाहीये, असं त्याच्या एका निकटवर्तीयानं सांगितलं.

 ‘बाहुबली : द कन्क्लुजन’
‘बाहुबली : द कन्क्लुजन’

सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून, तो नीट शांतपणे झोपूच शकलेला नाही. जगभरातून येणारे फोन घेताना, मेसेजना उत्तरं देताना आणि घरी येणाऱ्या नातेवाईक- मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारताना त्याची पार तारांबळ उडालीय.

अर्थात, या जागरणामुळे तो शरीरानं थकलाय, पण त्याच्या मनाला नवं बळ, ऊर्जा मिळालीय. लवकरच, एखाद्या सिनेमागृहात जाऊन चाहत्यांसोबत सिनेमा पाहण्याची, त्यांचा प्रतिसाद प्रत्यक्ष अनुभवण्याची त्याची इच्छा आहे असेही त्याच्या निकटवर्तीयाने सांगितले.
‘बाहुबली २’ सिनेमाने पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई या सिनेमानं केली आणि आता तो १००० कोटींकडे घोडदौड करतोय.

बाहुबली २
बाहुबली २