एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारणारा अभिनेता मधू प्रकाश याच्या पत्नीने मंगळवारी आत्महत्या केली. भारती असं त्यांचं नाव असून हैदराबादमध्ये एका खासगी कंपनीत त्या कामाला होत्या. मधू आणि भारती यांचं २०१५मध्ये लग्न झालं होतं. अभिनय क्षेत्रातील मधूच्या कामाने भारती फार खूश नव्हत्या. त्याचसोबत मधू यांचं विवाहबाह्य संबंध असल्याचा संशयही त्यांना होता.

मंगळवारी सकाळी मधू यांनी जिमला जात असल्याचं पत्नीला सांगितलं. तिथूनच चित्रीकरणासाठी जाणार असल्याचंही कळवलं होतं. त्यानंतर काही तासांनी भारती यांनी फोन करून पतीला घरी परतायला सांगितले आणि तो परत आला नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकीदेखील दिली. मधू ज्यावेळी घरी परतले, तेव्हा भारती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून मधू यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.