‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नव्याने सुरू होणाऱ्या बिग बॉस या कार्यक्रमाचे हे दहावे पर्व आहे. त्यामुळे दहाव्या पर्वात प्रेक्षकांसाठी बिग बॉस कोणते नवे सादरीकरण करणार आणि या वादग्रस्त घरात कोणत्या नव्या चर्चा रंगणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमामध्ये कोणते चेहरे दिसणार याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. पण, आता या चेहऱ्यांवरुन पडदा उठला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ‘आम आदमी’ला प्रकाशझोतात आणत ‘बिग बॉस’च्या घरात हे नवे पाहुणे राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या १० व्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करणार आहे.

सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात मॉडेल, अभिनेता, व्यावसायिक, शिक्षिका, दुधवाला असे सर्वसामान्य चेहरे दिसणार आहेत. पण, या वादग्रस्त घरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या सर्वसामान्य चेहऱ्यांनाही काही परीक्षा द्याव्या लागणार आहेतच. पण तुर्तास चर्चा आहे ती म्हणजे कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्वसामान्य चेहऱ्यांपैकी एका स्पर्धकाची.

मनोज कुमार बैसोया म्हणजेच मनवीर गुर्जर हा दुग्धव्यावसायिक सुद्धा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत आहे. नाकाच्या शेंड्यावर राग असणारा हा ‘देसी मुंडा’ मनवीर मुळचा नोएडाचा आहे. गुर्जर समाजसुधारणेसाठीच्या कामात हातभार लावणाऱ्यांमध्ये मनवीरचे नाव घेतले जाते. नोएडामध्ये तो अनेक सभा आणि मोर्चांमध्ये सक्रिय असतो. समाजहिताची कामे करण्याव्यतिरिक्त मनवीर त्याचा व्यवसाय आणि त्याच्या नावे असणारी एक डेअरी चालवतो. दिल्ली युनिव्हर्सिटीतून पदवीधारक असलेल्या मनवीरला व्यायाम, कुस्ती, कबड्डी अशा मैदानी खेळांची आवड आहे. असा हा सर्वसामान्य पण तितकाच रागीष्ट मनवीर ‘बिग बॉस’च्या घरात कितपत तग धरु शकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण त्याचा हा रागच ‘बिग बॉस’च्या घरामध्ये वादाचे कारण बनू शकतो.