‘बिग बॉसच्या ११’ व्या सीझनमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही नवे घटते आणि त्याचे रुपांतर वादात होते. एकीकडे विकास आणि शिल्पामध्ये भांडणं पाहायला मिळत होती. आता त्या दोघांमध्ये मैत्री झाली तर अर्शी आणि प्रियांकमध्ये नव्याने वाद सुरू झाले आहेत. या दिवसांमध्ये अर्शीचे एक वेगळेच रुप पाहायला मिळत आहे.

एका टास्कमध्ये संपूर्ण घराला एका कोर्टाचे रुप देण्यात येते. या कोर्टात  विकास गुप्ता आणि हिना खान यांना वकील करण्यात येते. या कोर्टात बंदगी आणि सपना या दोन न्यायाधीशांचीही नियुक्ती करण्यात आलेली असते. या कोर्टात अर्शीवर खटला भरण्यात येतो. या दरम्यान प्रियांक आणि हिना अर्शीबाबत अनेक अपशब्दांचा वापर करतात. हिना अर्शीवर आरोप करताना म्हणते की अर्शीची हितेनवर वाईट नजर आहे, तर प्रियांकही अर्शीसाठी अपशब्दांचा वापर करतो.

याच मुद्यावरुन अर्शीचा रागाचा पारा चढतो. रागाच्या भरात ती हिना आणि प्रियांकला चांगलेच सुनावते. या भांडणात विकास आणि शिल्पा अर्शीला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण अर्शीचा राग शांत न होता प्रत्येक मिनिटाला वाढतच जाताना दिसतो. हिना आणि प्रियांकच्या त्या शब्दांनी ती फारच दुखावली गेली हे तिच्या वागणुकीतून स्पष्ट दिसते.

यानंतर अर्शी हिनाला उद्देशून म्हणते की, ‘हिना खान कोण होते मला काही बोलणारी.. मला जे वाटतं ते मी घालेन.’ तसेच ती प्रियांकलाही बोलते की जर तो तिच्या जवळ जरी गेला तरी ती त्याला चपलेने मारेल.