हा पुरस्कार कुठचा, कोणाला, कशाला, का बरे असे ‘क’च्या बाराखडीतील प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. चित्रपट पुरस्कार म्हणजे एक ग्लॅमरस नृत्य अथवा विनोदी प्रसंग यामधून मिळणार्या वेळेत दिल्या जाणाऱ्या देखण्या बाहुल्या अशीही काहींनी त्याची व्याख्या केलीय… तेही जाऊ देत. चित्रपटसृष्टीत सतत वर्षभर रंगणारी गोष्ट म्हणजेच हे पुरस्कार असले, तरी एकाच वेळेस अनेकांना छानच सजून वावरायची व एकमेकांना ‘गले लगाके’ भेटण्यास व शुभेच्छा देण्यासाठीचे जणू हे संमेलनच! या सार्यात चित्रपटाच्या सेटवर युनिटची जेवणाची व्यवस्था पाहणारा, कॅमेरामनच्या सूचनेनुसार लाईटची व्यवस्था पाहणारा, कलाकारांचे त्या संपूर्ण चित्रपटासाठीची कपड्यांची व्यवस्था पाहणारा, तसेच साऊंड रेकार्डिस्ट, सेटिंगचे व्यवस्थापन करणारा, या सगळ्याचाच समन्वय साधतानाच निर्माता व हे युनिट यामधे समन्वय साधणारा आणि जवळपास या प्रत्येकाची काहीना काही गरज पूर्ण करणारा, स्टारच्या पाहुण्यांना वेळेत खुर्ची व चहा देणारा स्पॉटबॉय यांना कशाला हो कोण पुरस्कार देईल? चित्रपटाचे जग कलाकार, कारागीर (म्हणजेच कॅमेरामन इत्यादी) आणि हे असे कामगार अशा तीन ‘क’ने भरलंय. बाहेरच्या जगाला या वास्तवाची जाणीव नसते. चित्रपट विश्व म्हणजे ग्लॅमर, गॉसिप्स, गप्पा व गल्ला पेटीवर आकडे असा जणू फोर जीचा कारभार अशीच याची सर्वसाधारण व्याख्या. त्यात हे जेवण चहाची व्यवस्था सांभाळणारे, अभिनेत्रींना नऊवारी साडी नेसवणारी माणसे देखील खूप महत्त्वाची असतात. चित्रपटाच्या प्रत्यक्ष सेटवर गेल्यावर ही अशी माणसे आपले काम प्रामाणिकपणे व चोख करत असतात. त्यांचे कौतुक करायला हवे ना? काहींनी पिढ्यांनपिढ्या तर काहींनी आयुष्यभर हे काम केलंय वा करतात. पण यांच्या कामाला जणू सेटवरच ठेवून चित्रपट पडद्यावर येतो व कलाकारांच्या कौतुकाने तो रसिकांसमोर पोहोचतो. ही सिस्टीम बदलता येणार नाही. पण याच कामगारांचं कौतुक तर करता येईल? मराठी चित्रपटसृष्टीच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या ‘चिरायू’ सोहळ्यात याच कामगारांना ‘दादा पुरस्कार’ने गौरवण्यात आले. या सगळ्यांनाच चित्रपटसृष्टीत दादा नावाने ओळखतात म्हणून त्या नावाने हे पुरस्कार. यासाठीच सुशांत शेलार व त्याचे सहकारी यांचे विशेष कौतुक करायलाच हवे. चिरायूने एकूणच चित्रपटसृष्टीसमोर वेगळाच आदर्श ठेवण्यात यश मिळवले असेच म्हणायला हवे.
या एकाच सत्काराचाही भरपूर सकारात्मक परिणाम होईल, हे जास्तच महत्त्वाचे आहे. एक तर हे सत्कारमूर्ती ३०-३५ वर्षांच्या कारकिर्दीनंतरही अधिक उत्साहाने काम करतील. (यामध्ये विजय भोपे, शिवाजी कारले, मोहम्मद भाई, आशा मालपेकर इत्यादी) पण आपल्या माणसाचा असा सत्कार झाल्याने जवळपास संपूर्ण मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा कामगारांवर सकारात्मक परिणाम होईल. आपल्यालाही कधी तरी असा सत्काराचा योग येईल ही त्यांची आशा/ अपेक्षा त्यांना मानसिक समाधान देणारी ठरेल. हे खूपच महत्त्वाचे असते. अन्यथा वर्षानुवर्ष हे स्पॉटबॉय, जेवणाची व्यवस्था करणारे, सेट उभारण्यात हातभार लावणारे एकाच पद्धतीच्या कामात अडकून पडतात. एखादा दिग्दर्शक एका स्टुडिओत चहा बॉय म्हणून कामाला सुरुवात तर करतो पण मेहनतीने या व्यवसायात पुढची पावले टाकतोही. याउलट अभिनेत्री म्हणून पहिल्याच चित्रपटाला अपयश लाभल्याने हेअर ड्रेसर होणेही नशिबी आल्याचे घडलंय. पूर्वी नटराज स्टुडिओतील कॅंटिनमधून मुंबईतील काही स्टुडिओत दुपारचे जेवण जाई त्यामुळे नटराज स्टुडिओत एखाद्या चित्रपटाचा मुहूर्त झाल्यावर या कॅंटिनमध्ये गेल्यावर हिंदीतील कोणता स्टार कुठे बरे चित्रीकरण करतोय याचे तपशील मिळत. राजेश खन्ना तर काही वेळेस घरुन आलेले जेवण सेटवर एका टेबलावर मांडल्यावर आजूबाजूला नजर टाकून कोणी कामगार जेवायचा राहिलाय का, हे पाहायचे व त्याला ताट भरून देई. धर्मेंद्र कितीदा तरी गरजू कामगाराला मोठी नोट देई. अर्थात ही काही मोजकी उदाहरणे दिलीत. काही स्टार्सना या कामगारांचे अस्तित्व जाणवतच नाही असेही किस्से आहेत. तर काहीना हे सगळे लक्षात यायला काही स्टारना कालावधी जावा लागतो. कारण ते पडदाभरचे ग्लॅमर म्हणजेच येथील वास्तव समजतात. प्रत्यक्षात एकाद्या खूपच जुन्या स्टुडिओतील मेकअप रुमची अवस्था (खरं तर दुरावस्था) पाहिल्यावर ते गांगरतात. चित्रपटसृष्टीतील सर्वच विभागातील कामगारांना मात्र या सगळ्याच परिस्थितीची योग्य जाणीव असते. असे बिनचेहऱ्याने वावरणारे कामगार या क्षेत्रात भरपूर आहेत. त्यानाही शाबासकीची गरज असतेच. प्रत्यक्षात मात्र त्याच त्याच स्टारना वर्षभर सतत कुठेना कुठे नामांकन व पुरस्कार मिळतच असतात. त्यातील किती स्टारना या पुरस्काराचे मूल्य वाटते व किती जण त्याकडे शोभेची बाहुली म्हणून पाहतात हा प्रश्नच आहे. पण कामगाराला मात्र आयुष्यात मिळणारा एक पुरस्कार म्हणजे तो कुठे ठेवू नि कुठे नको असे वाटणारा आहे. अशा पुरस्काराला ग्लॅमर नसले तरी त्याचे थोडेसे का होईना पण प्रमाण वाढायला काय हरकत आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने असे पुरस्कार देण्यात येतात हे विशेषच कौतुकास्पद आहे. ‘चिरायू’ने या सगळ्यांवर फोकस टाकण्याची संधी मिळालीय…
– दिलीप ठाकूर