बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. पण यावेळी सलमान खानच्या ट्विटने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. सलमान खानने आपल्या ट्विटमध्ये ऋषी कपूर यांची माफी मागितली असल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. यामागील नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सलमान खानने शोक व्यक्त करताना ट्विटमध्ये म्हटलं की, “चिंटू सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो. जे काही बोललो असेल त्यासाठी माफी…तुमच्या कुटुंब आणि मित्र परिवाराला शांती, धैर्य लाभो”.

सलमान खान आणि ऋषी कपूर यांच्यात फार चांगले संबंध नव्हते. काही रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआआधी मुंबईमधील एका पबमध्ये सलमान खानसोबत त्याची भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी सलमान खानने रणबीर कपूरच्या कानाखाली लगावली होती. यामुळे रणबीर लगेचच पार्टी सोडून निघून गेला होता. यानंतर वडील सलीम खान यांनी ऋषी कपूर यांना फोन करुन सलमान खानच्या वतीने माफी मागितली होती.

यानंतर रणबीर कपूर कतरिना कैफला डेट करु लागल्यानंतर वाद अजून थोडा वाढला होता. सलमान खानने सुरुवातीच्या दिवसांमध्ये कतरिना कैफला मदत केली होती. सोबतच त्यांचे चांगले संबंध होते. यामुळे रणबीर कतरिनाला डेट करत असल्याने सलमान नाराज असल्याची चर्चा होती. रणबीरसोबत डेटिंग करत असताना कतरिनाने सलमानसोबत जास्त कामही केलं नाही. रणबीरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर कतरिना पुन्हा सलमानसोबत दिसू लागली

यानंतर सर्व काही सुरळीत आहे असं वाटत असतानाच ऋषी कपूर यांनी सलमान खानची वहिनी सीमा खानकडे नाराजी व्यक्त करत सलमान खान आपल्याला योग्य आदर देत नसल्याचं सुनावलं होतं. ही गोष्ट २०१८ मधील आहे. सोनम कपूरच्या लग्नात ऋषी कपूर यांनी सीमा खानसोबत यावरुन वाद घातला होता. सलमान खानला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तो खूप चिडला होता.

यानंतर सलमान खानने ऋषी कपूर यांचे नाव न घेता जर कोणी माझा व माझ्या परिवाराचा अपमान करत असेल तर मी त्या व्यक्तीला मान देऊ शकत नाही. फक्त तुमचं वय जास्त आहे म्हणून मी मान देणार नाही अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. महत्वाचं म्हणजे सलमान खान आणि ऋषी कपूर यांनी ये है जलवा (२००२) आणि टेल मी ओ खुदा (२०११) दोन चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं होतं. त्यामुळेच ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सलमान खानने त्यांची माफी मागितली.