सध्याच्या घडीला देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये जितके पलटवार होत नसतील तितके पलटवार कंगना-हृतिकच्या वादात होत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या या सत्रात आता आणखी एक वळण आलं आहे. मुख्य म्हणजे या वळणामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, कंगना आणि हृतिकमध्ये इमेलद्वारे झालेले संवाद आता हळूहळू सर्वांसमोर उघड होत आहेत. यामध्ये तिने दीपिका आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये असताना त्यांच्या नात्यातही दुरावा आणण्याचा प्रयत्न केला होता. किंबहुना रणबीरचं नाव घेऊन कंगना हृतिकच्या मनात इर्ष्येची भावना निर्माण करु पाहात होती असा आरोपही तिच्यावर लावण्यात आला होता.

‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कंगनाने पाठवलेल्या मेलमध्ये काही अशा गोष्टी नमूद केल्या आहेत ज्यामुळे तुम्हालाही धक्का बसेल. या मेलमध्ये म्हटल्यानुसार रणबीरनेच कंगनासोबतच्या नात्यामध्ये पुढाकार घेत तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी कंगना ग्वाल्हेरमध्ये असताना त्याने कंगनाला याविषयी विचारलं होतं. त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये पुन्हा कंगना आणि रणबीरमध्ये कोणत्याच प्रकारचा संपर्क झाला नव्हता. पण, त्याचवेळी तिने त्याच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यावर उत्तर देत रणबीरनेही आपल्यात एक सर्वसामान्य नातं ठेवू, असं म्हटलं होतं. पण, त्याचं हे उत्तर मिळताच कंगनाने आपण एका व्यक्तीच्या प्रेमात असून, त्याला याचं दु:ख होईल असं स्पष्ट केलं.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

मेलमध्ये कंगनाने दीपिकाच्या वागण्याला अर्थहीन म्हणत तिला तिच्या चुकीची जाणिव होईल अशी मी आशा करते असं स्पष्ट केलं होतं. ‘क्वीन’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दीपिकाने कधीच कंगनाला शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यातही तिच्या काही वक्तव्यामुळे कंगना दुखावली होती त्यामुळेच तिने दीपिकाविषयी असं लिहिलं होतं. कंगनाने तिच्या मेलमध्ये आता नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद केल्या होत्या याविषयी साशंकता आहे. पण, दर दिवसाआड या वादात नवनवीन गोष्टी समोर येत असल्यामुळे आता बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याशिवाय कोणीतरी समोर येऊन या सर्व प्रकार उघड करुन ही तेढ सोडवावी अशीच अनेकांना अपेक्षा आहे.