बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. तसेच याप्रकरणी दररोज वेगवेगळी माहिती समोर येत असल्याचे दिसत आहे. आज पुन्हा सीबीयाकडून सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी होणार आहे. दरम्यान बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने केलेले ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्याने रिया चक्रवर्ती ही केवळ एक मोहरा आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार मोठ्या लोकांना पाठिशी घातल आहे असे म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्रीने खळबळजनक ट्विट केले आहे. ‘एकदा एका फार्म हाऊसवर एसएसआर (सुशांत सिंह राजपूत)चे एका स्टारसोबत भांडण झाले होते. ज्या भांडणाला स्टारने सुरुवात केली होती. स्टारने रागाच्या भरात एसएसआरला धमकी दिली की त्याचे संपूर्ण करिअर संपवून टाकेल. जसं त्याने इतरांसोबत केले. रिया ही एक मोहरा आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार मोठ्या लोकांना पाठिशी घालत आहे’ या आशयाचे ट्विट विवेक अग्निहोत्रीने केले आहे.

‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘दन दना दन गोल’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आज काल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सामाजिक विषयांवर विवेक त्याचे मत मांडताना दिसतो. आता देखील त्याने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी ट्विट करत त्याचे मत मांडले आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकजण प्रतिक्रिया देत असून हे ट्विट सध्या चर्चेत आहे.