केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय बुधवारी घेतल्यानं विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. या निर्णयाचा विद्यार्थी आणि पालकांना एक प्रकारचा फटका बसला आहे. ‘सीबीएसई’ने हे दोन्ही पेपर फुटल्याने ते पुन्हा नव्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरपरीक्षेबाबत आता सेलिब्रिटींनीही नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या फेरपरीक्षेबाबत अभिनेता फरहान अख्तरने राग व्यक्त केला. त्याचबरोबर त्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छादेखील दिल्या. ‘ज्यांची काहीच चूक नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार हे ऐकूनच प्रचंड संताप येतोय. हे अत्यंत चुकीचं आहे. या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बळ मिळू दे,’ असं ट्विट त्याने केलं आहे. तर इमरान हाश्मीने या प्रकरणावर उपरोधिक भाष्य केलं आहे. इमरानने ट्विटमध्ये CBSCचा उल्लेख Corrupt Board for Students’ Education असा केला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयनंही याबद्दल नाराजी व्यक्त केली असून मिळालेल्या दुसऱ्या संधीचा फायदा घेत जोमाने अभ्यास करा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे.

वाचा : सर्वकाही मिळवूनही वरुणला का जाणवतेय ‘त्या’ गोष्टीची खंत?

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर पेपरफूट होणार नाही हे निश्चित करण्यासाठी येत्या सोमवारपासून नवी पद्धत लागू करण्यात येणार असून, कुणावरही अन्याय होणार नाही हेही सरकार निश्चित करेल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.