अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता ‘रणवीर सिंग गोलियों की रासलीला- राम लीला’ या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकले. त्यानंतर ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेली ही जोडी लवकरच लग्न करणार असून नुकतीच या दोघांनी ट्विटरवर लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.

येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपिका-रणवीरचा विवाहसोहळा पार पडणार असल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर पत्रिका शेअर केली होती. शेअर करण्यात आलेल्या पत्रिकेमध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये मजकूर छापण्यात आला होता.परंतु या पत्रिकेत काही चुका आढळल्यामुळे सध्या सोशल मिडियावर रणवीर-दीपिकाला ट्रोल करण्यात आलं आहे.

व्हायरल होत असलेल्या पत्रिकेमध्ये दीपिकाच्या नावात वेलांटी चुकीची लिहीण्यात आली आहे. ‘दीपिका’ ऐवजी ‘दीपीका’ असं लिहीण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या रणवीर-दीपिका ट्रोल झाले आहेत. स्वत:च्याच लग्नपत्रिकेमध्ये कोणी स्वत: चचं नाव चुकीचं कधी लिहीतात का ?, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहेत.

इतकंच नाही तर लग्नाच्या १४ आणि १५ अशा दोन तारखा देण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून यावरुनही त्यांनी ट्रोल करण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच या पत्रिकेमध्ये लग्नसोहळा कुठे पार पडणार याविषयीही नमूद न करण्यात आल्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बॉलिवूडच्या ‘बाजीराव- मस्तानी’च्या लग्नसोहळ्याविषयी चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली असून या जोडीने डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिल्याचं सांगण्यात येत आहे. हा विवाहसोहळा पार पडल्यानंतर बंगळुरु आणि मुंबईत त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही कळत आहे.