आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी चित्रपटसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याला आज ३१ वर्ष पूर्ण झाली. एवढी वर्षे उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. या सिनेमामधील प्रत्येक पात्र आजही अनेकांच्या चांगलेच लक्षात आहे. अगदी अशोक सराफपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकरपासून अश्विनी भावेपर्यंत अनेकजणांनी या सिनेमामध्ये अजरामर भूमिका साकारल्या. या सिनेमामध्ये अशोक मामा, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतीने एक तुलनेने नवखा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस आला तो म्हणजे शंतनूच्या रुपात. अशोक सराफच्या म्हणजेच धनंजय मानेच्या भावाची भूमिका साकारली होती सिद्धार्थ रे यांनी. दिग्गज कलाकारांबरोबर प्रेक्षकांना हसवणारे सिद्धार्थ हे अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. ८ मार्च २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सिद्धार्थ यांचा जन्म १९ जुलै १९६३ साली एका मराठी- जैन कुटुंबात झाला होता. सिद्धार्थ हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांचे नातू होते. व्ही. शांताराम हे सिद्धार्थची आई चारुशीला रे यांचे वडील होते. ‘अशी ही बनवाबनवी’मधून सिद्धार्थ यांचा चेहरा महाराष्ट्रभरात पोहोचला पण त्याआधीही त्यांनी दोन सिनेमांमध्ये काम केले होते. १९८० मध्ये 'थोडीसी बेवफाई' आणि १९८२ 'मातली किंग' या सिनेमांमध्ये सिद्धार्थ यांनी काम केले होते. ‘अशी ही बनवाबनवी’नंतर सिद्धार्थने 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' (१९८९) या चित्रपटात त्यांनी अलका कुबल यांच्या पतीची भूमिका पार पाडली होती. 'चाणी' या रंजना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर सिद्धार्थ 'बाजीगर', 'परवाने', 'वंश', 'जानी दुश्मन', 'पहचान' अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले. २००४ साली प्रदर्शित झालेला 'चरस' हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला ठरला. सिद्धार्थ यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत असताना अचानक हृदयविकाराने झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने अवघ्या सिनेसृष्टीने धक्का बसला. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करत एका चांगल्या अभिनेत्याला सिनेसृष्टी मुकल्याची भावना व्यक्त केली होती. १९९९ साली सिद्धार्थ हे दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत लग्नबंधनात अडकले. त्यांना सोनिया आणि शिशया नावाच्या दोन मुली आहेत. सिद्धार्थ यांचे निधन झाले तेव्हा या दोघीही चार वर्षांपेक्षा लहान वयाच्या होत्या. शांतीप्रिया यांनी तामिळ, तेलुगू तसेच हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. 'फुल और अंगार', 'मेहेरबान', 'मेरा सजना साथ निभाना', 'वीरता', 'अंधा इतंकाम', 'हॅमिल्टन पॅलेस', 'सौगंध', 'इक्के पे इक्का' या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती यासारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर शांतीप्रिया यांनी काम केले आहे.