दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘दंगल गर्ल’ अर्थात झायरा वसीम हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना व अभिनेता अक्षय कुमार यांना सणसणीत टोला लगावला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राजकीय प्रवासासोबतच मोदींचं बालपण, विरोधकांसोबतचं नातं आणि विशेष म्हणजे त्यांना आंबे खायला आवडतात का हा प्रश्नसुद्धा त्याने विचारला होता. या प्रश्नाच्याच संदर्भावरून झायराने मोदी व अक्षय कुमारला टोमणा मारला आहे.

‘तुम्ही आंबे कसे खाता याऐवजी तुम्हाला रात्री शांत झोप कशी लागते हा प्रश्न विचारायला पाहिजे’, असं खोचक ट्विट झायराने केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत हिंसक आंदोलन झाले. या हिंसाचारात काहींचे प्राणही गेले. दिल्लीतल्या या हिंचासाराविरोधात अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे मतं मांडली. त्यात झायराने केलेल्या या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अक्षय कुमारने मोदींची घेतलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीत विचारलेला आंब्याचा प्रश्न त्यावेळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

झायराने अभिनयक्षेत्र सोडलं आहे. ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे,’ असं म्हणत तिने बॉलिवूडला रामराम केला. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय आहे. चालू घडामोडींवर ती ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असते.