लॉकडाऊननंतर मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी वाढत आहेत. त्यात मराठी अभिनेता गौरव घाटणेकरला मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये चांगली संधी मिळाली आहे. एकाच वेळेस त्याच्या झीच्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही उपग्रह वाहिन्यांवर मालिका सुरू आहेत.

‘काय घडलं त्या रात्री’ आणि ‘क्यो रिश्तो मे कट्टी बट्टी ‘ या त्या मालिका असून दोन्हींमध्ये त्याच्या वेगळ्या भूमिका आहेत. खरं तर खूप कमी कलाकारांच्या बाबतीत हा असा एकाच वेळेस दोन्हीकडे भूमिका साकारण्याचा योग येतो. भगवान के घर देर है, मगर अंधेर नही अशीच गौरवची भावना आहे.

आपण किती वर्षे काम करतो, यापेक्षा आपण आपली भूमिका कशी सादर करतो, हे कलाकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते असे गौरव म्हणतो. अभिनयासोबतच गौरव फिटनेसलाही सर्वाधिक महत्त्व देतो. “कोणतीही गोष्ट, कोणताही व्यायामाचा प्रकार मनापासून आणि जिद्दीने करायला हवा. आपण जे करतो आहोत ते आपण मनापासून, आवडीने केलं तरच त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो. फिटनेसच्या बाबतीत तर ते महत्त्वाचं आहे,” असं तो म्हणतो.