बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले, पण लग्नाच्या विषयावर आपण अजूनही साशंक असल्याचे मत खुद्द सलमानने पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले. पुण्यातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सलमानने दिलखुलासपणे उत्तरे दिली. लग्नाचा विषय निघताच उपस्थित विद्यार्थ्यांनी एकच कल्ला सुरू केला. त्यावर प्रतिक्रिया देताना सलमानने ‘तुम्हाला माझ्या कपाळावर आलेला घाम दिसतोय का? इथे उपस्थित असलेल्या इतर कोणाच्याही कपाळावर घाम दिसणार नाही. कारण येथील वातावरण चांगले आहे. पण लग्नाचा विषय निघाला की माझे असेच होते. कपाळावर घाम येतो’, असे मिश्किल उत्तर सलमानने दिले. लग्नाचा विषय येतो तेव्हा मी गोंधळून जातो. पण माझी तीन-चार मुलं असावीत अशी इच्छा नक्की आहे. अर्थात लग्न केल्याशिवाय ते शक्य नाही. तरीही मी काहीतरी मार्ग काढेन, असेही सलमान पुढे म्हणाला. आधी लग्नाचं वय नव्हतं आणि आता लग्नाचं वय निघून गेलयं, पण मी आहे त्यात खूप आनंद असल्याचे सलमानने सांगितले.