टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी नेहमीच अनेकांच्या चर्चेचा विषय असते. हल्ली तर त्यांनी आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलण्यासही सुरुवात केली आहे. आमिर खानसोबत दिवाळी स्पेशल कार्यक्रमात झळकल्यानंतर आता विराटची आणखी एक मुलाखत चर्चेत आली आहे. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात त्याने अनुष्काविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.
अनुष्कामुळे विराटच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि मुख्य म्हणजे तिच्यामुळे आयुष्यात स्थिरता आल्याचं तो सांगतो. ‘माझ्या आयुष्यात असलेल्या त्या व्यक्तीची ही जादू आहे. तिने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत माझ्यात चांगले बदलसुद्धा झाले आहेत. शांतपणे गोष्टी कशा हाताळता येतात, आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करावा, हे सर्व तिने मला शिकवलं,’ असं तो म्हणाला.
अनुष्काने चांगल्या आणि वाईट परिस्थितीत साथ दिली आणि तिची हीच गोष्ट सर्वाधिक आवडत असल्याचं तो म्हणतो. याविषयी विराट पुढे म्हणाला की, ‘प्रत्येक वेळी तिने मला प्रोत्साहित केलं. ती नेहमीच खंबीरपणे माझ्या बाजूने उभी राहिली. ही गोष्ट आम्हा दोघांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण त्यावेळी दोघांवर टीकांचा भडीमार होत होता. ‘या तरुण खेळाडूंना फक्त मौजमजा करायची असते,’ अशी टीका अनेकांनी केली. मात्र, फक्त लोकांना वाटतं की मी रिलेशनशिपमध्ये राहू नये, म्हणून मी राहू नये का? हे अर्थहीन आहे.’
वाचा : ‘दोन अयशस्वी लग्नांनंतर हे नातं माझ्यासाठी नसल्याची मला जाणीव झाली आहे’
झहीर खानमुळे आपण मोकळेपणाने रिलेशनशिपबद्दल बोलू लागल्याचंही विराटने या मुलाखतीत मान्य केलं. इतरांचा विचार न करता, आपल्याला जे करायचं आहे ते करावं, ही शिकवण झहीरकडूनच मिळाल्याचं तो सांगतो. गौरव कपूरला दिलेल्या या मुलाखतीअखेर विराटने गौरवच्या ‘प्यार किया तो डरना क्या,’ या वाक्यालाही स्मितहास्याने सहमती दर्शवली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 2:07 pm