अनुराग बसू आणि रणबीर कपूर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. अनुराग दिग्दर्शित आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात रणबीर मुख्य भूमिकेत दिसेल. ‘बर्फी’नंतर रणबीरसोबत दुसरा चित्रपट करत असलेल्या अनुरागला सलमानपेक्षा रणबीरसोबत काम करणे जास्त योग्य वाटत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
अलिकडे रणबीर कपूरचे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग आदळले आहेत. अशा वेळी त्याला चित्रपटात स्थान दिल्याबद्दल अनुरागला विचारले असता तो म्हणाला की, ‘सलमान खानसारख्या बोरिंग अभिनेत्यासोबत काम करण्यापेक्षा मी रणबीरसारख्या जोखीम पत्करणा-या अभिनेत्यासोबत काम करणे योग्य समजतो. अभिनयात कलात्मक प्रयोग करण्याच्या रणबीरच्या या स्वभावाचे मला कौतुक वाटते. आव्हानात्मक काम करण्याचे साहस त्याच्यात आहे. खूप कमी अभिनेते आहेत जे आपल्या कामात जोखीम घेणे पत्करतात. तो सलमानसारखा बोरिंग नाही जो एकसारखेच काम प्रत्येक चित्रपटात करत जातोय. रणबीरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई करत नाहीत. पण एक अभिनेता म्हणून त्याने साकारलेल्या विविध भूमिकांचे त्याला समाधान आहे. ‘बेशरम’, ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘रॉ़य’ हे तिनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले. पण यात रणबीरची काहीच चुकी नाही. भारतात चित्रपटाच्या अपयशाला अभिनेत्यास जबाबदार ठरविले जाते. खरं तर ही जबाबदारी दिग्दर्शकाची आहे.’
येत्या शुक्रवारी रणबीर आणि दीपिकाचा ‘तमाशा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करण्यास यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.