राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ हा आसामी चित्रपट ‘ऑस्कर’च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड झाली होती.‘पद्मावत’, ‘राजी’, ‘पीहू’, ‘कडवी हवा’ आणि ‘न्यूड’ यांसारख्या चित्रपटांमधून ‘विलेज रॉकस्टार्स’ या चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी करण्यात आली होती. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आहे. मतांच्या जोरावर आता सर्वोत्तम नऊ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट गरीब मुलांच्या आयुष्याची कथा सांगतो. संगीत क्षेत्रात आपलं नाव कमावण्यासाठी धडपड करत असलेल्या एका १० वर्षीय मुलीची कथा ‘विलेज रॉकस्टार्स’ मधून दाखवण्यात आली आहे. रीमा दास दिग्दर्शित या चित्रपटाने यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. तर दमदार अभिनयकौशल्यामुळे भनिता दास हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कारदेखील मिळाला. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि ४४ इतर पुरस्कार या चित्रपटानं आपल्या नावावर केले आहेत. जवळपास ७०हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही विलेज रॉकस्टार दाखवण्यात आला होता. मात्र ऑस्करच्या यादीत शेवटपर्यंत हा चित्रपट पोहोचू शकला नाही. यापूर्वी 'मदर इंडिया', 'सलाम बॉम्बे', 'लगान' हेच चित्रपट ऑस्करच्या यादीच पहिल्या पाचपर्यंत पोहचू शकले होते. एकूण २९ चित्रपटांमधून निवड झालेल्या 'विलेज रॉकस्टार' कडून भारतीयांना खूपच अपेक्षा होत्या.