हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘जम्पिंग जॅक’ म्हणून अभिनेते जितेंद्र हे ओळखले जायचे. जितेंद्र यांच्या व्यक्तिमत्वाची आजही अनेकांना भुरळ पडते. बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकाराचा आज ७ एप्रिल रोजी वाढदिवस. अभिनय आणि खास नृत्यशैलीच्या जोरावर प्रसिद्ध झालेल्या जितेंद्र यांचा चाहतावर्ग देखील तितकाच मोठा आहे. जितेंद्र यांनी कलाविश्वापासून फारकत घेतली असली तरीदेखील त्यांच्याविषयीचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात फार कमी जणांना माहित असेल की, जितेंद्र यांना ड्रिमगर्ल अर्थात हेमामालिनींसोबत लग्न करायचं होतं. मात्र त्यांचं लग्न झालं नाही.

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी याचे त्याकाळी असंख्य चाहते होते. केवळ सामान्य नागरिकचं नाही तर कलाविश्वातील काही अभिनेत्यांवरही हेमामालिनीची भुरळ होती. त्यामुळे कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांना त्यांच्यासोबत लग्न करायचं होतं. यातलं एक नाव म्हणजे अभिनेता जितेंद्र. खरंतर जितेंद्र यांची लव्हस्टोरी थोडी हटके आहे. संजीव कुमार यांचं हेमामालिनींसोबत सूत जुळविण्याच्या नादात तेच कधी हेमामालिनींच्या प्रेमात पडले हे त्यांनादेखील समजलं नाही.

अभिनेता संजीव कुमार यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते म्हणून त्यांनी जितेंद्र यांची मदत घ्यायचे ठरवले. संजय यांनी जितेंद्रला त्यांच्या मनातील गोष्ट हेमापर्यंत पोहोचवायला सांगितले. पण तेव्हा हेमा यांनी संजीव यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. असे म्हटले जाते की, हेमा यांनी संजीव यांना लग्नासाठी नकार दिला असला तरी त्यांना जितेंद्र आवडू लागले होते. जितेंद्र आणि हेमा यांनी ‘दुल्हन’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघांच्या घरातल्यांनीही लग्नासाठी परवानगी दिली होती. जितेंद्र यांना हेमा यांच्याशी लग्न करण्याची इच्छा तर होती पण तेव्हा ते शोभा यांना डेट करत होते.

शोभा आणि जितेंद्र हे लहानपणीपासूनचे मित्र होते. शोभा यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी हेमा यांना जितेंद्रंना समजावयाला सांगितले. पण यादरम्यान हेमा आणि जितेंद्र यांचे कुटुंबीय एकमेकांना भेटले. एकीकडे दोन कुटुंब एकमेकांना भेटत असतानाच अभिनेता धर्मेंद्र यांनी हेमामालिनी यांना फोन करुन त्यांच्या प्रेमाची कबूली दिली. त्यानंतर हेमा आणि धर्मेंद्र यांची भेट झाली आणि तेथेच त्यांचं सूत जुळलं. त्यामुळे हेमा यांनी जितेंद्रंच्या प्रेमाला नकार दिला.

दरम्यान, हेमा यांनी संजीव कुमार आणि जितेंद्र यांना नकार दिल्यानंतर त्यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झाल्यामुळे त्यांनी या लग्नाला विरोध दर्शविला होता. त्यातच धर्मेंद्र यांची पहिली पत्नी त्यांना घटस्फोट देण्यास तयार नव्हती म्हणून धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जातं.