अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाची वेळ आता हळूहळू जवळ येऊ लागली आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण देशातील नागरिक उत्सुक आहेत. हा आनंद सामान्यांपासून ते कलाविश्वापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळत असून अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत तिचा आनंद व्यक्त केला आहे.

कंगनाने लागोपाठ काही ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. यातील एका ट्विटमध्ये तिने जय श्री राम म्हणत  ५०० वर्षांमधील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये रामराज्य पुन्हा स्थापन झालं असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या कंगनाचं हे ट्विट चांगलंच चर्चिले जात आहेत.

“आज पुन्हा एकदा रामराज्य स्थापन होणार आहे. भगवान राम केवळ एक राजाच नव्हे तर जीवन जगण्याची एक प्रेरणा, मार्ग आहेत”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. या ट्विटप्रमाणेच कंगनाने काही काळापूर्वी असंच एक ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

“एक असा प्रवास ज्यात प्रेम, श्रद्धा आणि भक्ती यांचा भाव आहे. सभ्यतेची एक यात्रा ज्यात भगवान श्रीराम यांची अगाध महिमेची गाथा आहे. जय श्री राम”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाची तयारी पूर्ण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल झाले आहेत. लवकरच ते आयोध्येमध्ये पोहोचतील. आज दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.