बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरात सोनम, प्रियांका, दीपिका अशा बॉलिवूडच्या आघाडीच्या तारका विवाहबंधनात अडकल्या. या तिघींच्या पाठोपाठ आता आलिया- रणबीरच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली. मात्र लग्नाचं नंतर पाहू तोपर्यंत छान छान चित्रपट पाहून आयुष्य मजेत घालवा असं उत्तर देत आलियानं या चर्चांतून पळ काढला. आलियानंतर अर्थात कतरिनालाही लग्नाबद्दल  प्रश्न विचारण्यात आला मात्र तिनं आपल्या स्टाइलनं या प्रश्नाचं अजब उत्तर दिलं.

‘सगळेच लग्न करत आहेत हे पाहून मला एवढंच सांगावसं वाटतं की कृपा करून मला मागे सोडू नका माझ्यासाठी कोणीतरी थांबा’ असं मिश्किल उत्तर तिनं दिलं आहे. कतरिना ज्यावेळी बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिचं नाव सलमान खानसोबत जोडलं गेलं. ती आणि सलमान लग्न करतील अशाही चर्चा काही वर्षांपूर्वी होत्या. मात्र नंतर कतरिनाच्या आयुष्यात रणबीर कपूर आला.

पण ‘अजब प्रेमकी गजब कहानी’पासून सुरू झालेलं या दोघांचं प्रेमप्रकरण ‘जग्गा जासूस’च्या सेटवर संपलं. त्यानंतर रणबीरनं कतरिनाची जीवलग मैत्रीण आलिया भट्टसोबत सुत जुळवलं. कतरिना ३५ वर्षांची आहे , पण तूर्त लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. सध्या ती ‘भारत’ या तिच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे.