छोट्या पडद्यावरील केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती हा शो सध्या चांगल्याच रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. अलिकडेच झालेल्या भागात केबीसीला तिसरा करोडपती विजेता स्पर्धक मिळाला आहे. विशेष म्हणजे या भागातदेखील एक महिलाच विजयी ठरली आहे. त्यामुळे सध्या या पर्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासोबतच अनुपा यांना विचारण्यात आलेला प्रश्नदेखील चांगलाच चर्चिला जात आहे.

छत्तीसगढच्या अनुपा दास यांनी १९६२ साली घडलेल्या एका घटनेविषयी अचूक उत्तर देत १ कोटी रुपये जिंकले आहेत. १८ नोव्हेंबर १९६२ मध्ये लडाखमधील रेजांग ला येथील शौर्यसाठी कोणाला परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? असा प्रश्न अनुपा यांनी १ कोटींसाठी विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर मेजर शैतान सिंह हे होतं.

दरम्यान, या प्रश्नासाठी अनुपा यांनी ५०-५० लाइफलाइन वापरली आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं. विशेष म्हणजे ही जिंकलेली रक्कम आईच्या उपचारांसाठी आणि शाळेतील मुलींच्या भविष्यासाठी वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.