जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना सावरकरांच्या देशभक्तीबद्दल आणि स्वाभिमानबद्दल माहित नाही, असं ट्विट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर लतादीदींनी हा ट्विट केला आहे. वीर सावरकर यांनी दोन राष्ट्राची संकल्पना आणण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर मोहम्मद जिना यांनी ती संकल्पना स्वीकारली, असं विधान भूपेश बघेल यांनी केलं होतं. 'नमस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या व्यक्तित्त्वाला आणि देशभक्तीला प्रणाम करते. आज काल काही लोक सावरकरांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की सावरकरजी किती मोठे देशभक्त आणि स्वाभिमानी होते,' असं लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. भूपेश बघेल यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची फार चर्चा होत आहे. 'सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजांना माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली. त्यानंतर जेलमधून सुटल्यावर त्यांनी स्वतंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही असंही भूपेश बघेल म्हणाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटला आहे.