sanjay-madhuri-dixitबॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटामुळे माधुरी दीक्षित आणि संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परिणामी माधुरीची मन:स्थिती ठीक नसल्याचे समजते. संजय दत्तच्या जीवनावर साकारणाऱ्या चित्रपटाने माधुरीची मन:स्थिती ठीक नसण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगावासाची शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तच्या जीवनावर चित्रपट साकारण्याची मनिषा राजू हिरानींनी व्यक्त केली. या चित्रपटाच्या निर्मितीची तयारीदेखील सुरू झाली आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. संजय दत्तच्या जीवनातील अमलीपदार्थाच्या सेवनापासून तुरुंगवासापर्यंतच्या प्रवासाबरोबरच त्याच्या आयुष्यातील इतर पैलूदेखील या चित्रपटात उलगडले जाणार आहेत. चित्रपटात इतक्या गोष्टी असणार म्हटल्यावर माधुरीचे नावदेखील ओघाने येणारचं. एकेकाळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित दरम्यान चांगलीच जवळीक होती. या कारणामुळेच संजय दत्तच्या जीवनावर साकारण्यात येणाऱ्या चित्रपटामुळे माधुरी सध्या चिंतेने ग्रासलेली आहे. आपले नाव या चित्रपटासोबत जोडण्यात येऊ नये याबाबत तिने संजय दत्तशी फोनवरून संवाद साधल्याचे समजते. संजय दत्तची आणि आपली मुले आता मोठी झाली असून २५ वर्षे जुनी पाने उलटण्यात काहीच अर्थ नसल्याचे तिचे म्हणणे आहे. माधुरीच्या फोन कॉलला संजय दत्तने काय प्रतिक्रिया दिली हे अद्याप समजलेले नाही. नव्वदच्या दशकात ऑन स्क्रिनवरील हे कपल ऑफ स्क्रिनदेखील तितकेच हॉट होते. ‘साजन’ आणि ‘खलनायक’सारख्या हीट चित्रपटांमधून ही जोडी एकत्र दिसली होती. या दरम्यान दोघांमधील वाढती जवळीक चर्चेचा विषय झाली होती. संजय दत्तच्या पूर्व इतिहासामुळे माधुरीच्या घरच्यांना ही जवळीक पसंत नव्हती. संजय दत्तच्या जीवनावर साकारत असलेल्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे.

madhuri-sanjay

madhuri-sanjay-dut