करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योगाला जोरदार फटका बसला आहे. अनेक मोठे चित्रपट लांबणीवर गेले आहेत. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत मराठी मनोरंजनसृष्टी कुठे उभी आहे? यावर चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मराठी प्रेक्षकांनाच आपले चित्रपट पाहायचे नाहीत, त्यामुळे मराठी सिनेसृष्टी आर्थिक कोंडीत सापडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: “असत्याचा पराभव निश्चित”; अभिनेत्याचं रियाच्या वकिलांना आव्हान

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मराठी मनोरंजनसृष्टीतील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “करोना आणि लॉकडाउनमुळे मराठी सिनेसृष्टीची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली आहे. सध्या आपल्याकडे वेट अँड वॉचचाच पर्याय उपलब्ध आहे. सिनेमागृह सुरु होतील, प्रेक्षक येऊन चित्रपट पाहतील. आणि परिस्थिती सुधारेल अशीच अपेक्षा आपण करु शकतो. आपली स्पर्धा हिंदी सिनेसृष्टीशी आहे. पण या स्पर्धेत आपण मागे पडत चाललो आहोत. कारण मराठी प्रेक्षकच आपल्या चित्रपटांना प्रतिसाद देत नाहीत. आपल्या प्रेक्षकांचा कल मराठी चित्रपटांऐवजी हिंदी पाहण्याकडे अधिक आहे. त्यामुळे या करोनाच्या फटक्यातून बॉलिवूड लवकर बाहेर पडेल. पण मराठीचं काही सांगता येत नाही. तसंच आता OTT प्लॅटफॉर्मवर देखील हिंदी चित्रपट आणि मालिकांचीच चलती आहे. त्यात प्रादेशिक भाषांसाठी जी जागा होती ती पाश्चात्य चित्रपटांनी व्यापून टाकली, त्यामुळे तिथेही मराठी मनोरंजन क्षेत्र काहीसं मागे पडल्याचं दिसत आहे. ही परिस्थिती लॉकडाउन आणि करोनामुळे आणखी बिकट होत चाचली आहे.” अशा भावना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केल्या.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…

देशात २४ तासांत ४८,६६१ रुग्ण

देशभरात गेल्या चोवीस तासांत करोनाचे ४८ हजार ६६१ रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचली आहे. सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारांनजीक रुग्णवाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी ३६ हजार १४५ रुग्ण करोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आठ लाख ८५ हजार ५७६ झाली असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. चार लाख ६७,८८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये चार लाख ४२ हजार २६३ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन लाख ६२ हजार १५३ चाचण्या सरकारी, तर ७९,८७८ चाचण्या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये केल्या गेल्या. आतापर्यंत एक कोटी ६२ लाख ९१ हजार ३३१ चाचण्या झाल्या असून १० लाख लोकांमागे ११,८०५ चाचण्या होत आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेतर्फे देण्यात आली.