अभिनेत्री महिमा चौधरीने १९९७ मध्ये ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. मात्र २०१० नंतर ती चित्रपटांमध्ये फारशी झळकलीच नाही. करिअरच्या सुरुवातीलाच तिचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा परिणाम पुढे तिच्या करिअरवरही झाला. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने या भीषण अपघाताच्या आठवणी सांगितल्या होत्या.

काय म्हणाली महिमा?

‘परदेस’ आणि ‘दाग : द फायर’ या दोन चित्रपटांनंतर माझ्या करिअरला ब्रेक लागला. मला फारसे ऑफर्स येत नव्हते. त्यावेळी मी अजय देवगण आणि काजोलच्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटात काम करत होते. बेंगळुरूमध्ये स्टुडिओला जाताना माझ्या कारचा भीषण अपघात झाला. एका ट्रकने कारला धडक दिली होती. या अपघातातून मी मरता मरता वाचले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा आरशात पाहिलं, तेव्हा धक्काच बसला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ६७ काचांचे तुकडे काढले होते. तो खूप भयानक अनुभव होता.

अपघातानंतर बरेच दिवस मला घरीच राहावं लागलं. उजेडात, कॅमेऱ्याच्या लाइटमध्ये जाण्यास बंदी होती. मी स्वत:ला आरशात पाहू शकत नव्हते. त्यावेळी माझ्या हातून चित्रपटांच्या बऱ्याच ऑफर्स निघून गेल्या. अपघाताविषयी मी कोणाला फार काही सांगितलं नाही. कारण त्या काळी लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा होता. “हिचा तर चेहरा खराब झाला, दुसऱ्या अभिनेत्रीला साइन करू”, असं ते म्हणाले असते.

या अपघातातून महिमा चौधरी जेव्हा बरी झाली, तेव्हा अक्षय कुमारने तिला ‘धडकन’ या चित्रपटाची ऑफर दिली होती. या कठीण काळात कुटुंबीयांनी फार मदत केल्याचंही तिने सांगितलं.