लेखक वसंत सबनीस यांनी लिहीलेले स्वतंत्र सामाजिक विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तब्बल ३२ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात रंगभूमीवर येत आहे. श्री साई प्रोडक्शन व स्पंदन निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन मंगलदास माने यांनी केले आहे. येत्या रविवारी, दिनांक २४ जून रोजी सातारा रोडवरील आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हा प्रयोग रंगणार आहे.

‘मामला चोरीचा’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिनांक ६ मे १९८५ रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर, पुणे येथे झाला होता. दामू केंकरे दिग्दर्शित या नाटकामध्ये शरद तळवळकर, अश्विनी देसाई यांनी भूमिका साकारल्या होत्या. तर यावेळी आदर्श गायकवाड, सागर पवार, संजय देवळे, केतकी लांडे, ऐश्वर्या कुलकर्णी, संजय चव्हाण आणि विद्या भागवत हे कलाकार असणार आहेत. दिग्दर्शक मंगलदास माने यांनी यापूर्वी ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘सखाराम बाईंडर’, ‘ह्यांच हे असंच असतं’, ‘जमलं बुवा एकदाचं’ या नाटकांचे दिग्दर्शन केले.

वाचा : ‘पॅडमॅन’ची निर्माती प्रेरणा अरोराविरोधात तक्रार दाखल 

वसंत सबनीस यांच्या ‘मामला चोरीचा’ या नाटकामध्ये नव-याला मुठीत ठेवणारी पत्नी आणि एकूणच घराला जेरबंद करणा-या कमलादेवी शेलार यांची जिरवण्याचा प्रयत्न खूपच सुंदररित्या रंगवलेला आहे. कमलादेवींचा घरात दरारा असल्यामुळे त्यांचे पती भाऊराव, मुलगा शंतनू आणि मुलगी शीतल हे तिघेही कमलादेवीच्या अधिकाराखालील हुकूमशाहीत वावरत असतात. त्यातच शितलचे विजयशी आणि शंतनूचे अनिताशी प्रेमसंबंध असतात. पण आपल्या प्रेमाला कमलादेवींच्या घरात काहीही थारा मिळणार नाही, हे ते दोघे जाणतात. पण आयुष्यभर बायकोच्या हुकूमशाहीला त्रासलेले भाऊरावच बंडाच्या दिशेने पाऊल उचलतात. कमलादेवींच्या विरोधात घरातील सर्व लोक खूप कटकारस्थाने रचतात मात्र त्यापुढे कमलादेवी हार पत्करतात की त्यावर मात देतात हे मात्र प्रेक्षकांना नवीन नाट्यप्रयोगात पाहायला मिळणार आहे. कालांतराने दैनंदिन कौटुंबिक जीवनात झालेले बदल या नवीन नाटकात दाखवण्यात आलेले आहे.

वाचा : बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विचाराने कित्येक रात्र झोपत नाही- नवाजुद्दीन

दिग्दर्शक मंगलदास माने म्हणाले, पिढ्यानपिढ्या बदलल्या तरी कुटुंबातील आई ही आईच असते. आजच्या पिढीमध्ये आईची भूमिका बदलत चालली आहे. आईने आपल्या मुलांना किती सवलत द्यावी की धाकात ठेवावे हा विचार समाज करीत आहे. अशातच वसंत सबनीस यांच्या ‘मामला चोरीचा’ यावर नव्या रुपात हे नाटक रंगमंचावर सादर करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मृणाल माने व सीमा गायकवाड या निर्मात्या म्हणून लाभल्या. तसेच मोहन कुलकर्णी यांनी मनोरंजन संस्थेच्यावतीने नाट्यप्रयोगाचे व्यवस्थापन उत्तमरित्या पाहिले. त्यामुळेच हे नाटक आज ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.