सध्या राज्यभरात ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटावर सुरुवातीला बरीच टिकाटिप्पणी झाली पण जेव्हा चित्रपटगृहांत तो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारित सहकुटुंब पाहता येईल असा चित्रपट प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा चित्रपट, त्याचे कथानक, संवाद यांसोबतच आणखी एका गोष्टीने लोकांची मनं जिंकली आहे ती म्हणजे प्रवीण तरडे यांची बेधडक वक्तव्यं आणि मतं. शेतकरांवर होणारा अन्याय, विकासांचे पर्याय शोधताना शेतकऱ्यांचा न केलेला विचार, तहसीलदारांवर होणारे हल्ले यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात आपल्या चित्रपटांतून सामाजिक मुद्द्यांना अधोरेखित करणार असल्याचं सांगतानाच ‘मुळशी पॅटर्न’नंतर आता ‘रेती पॅटर्न’ घेऊन येणार असं प्रवीण तरडे म्हणाले.

‘देशाचा विकास करताना आपण शेतकऱ्यांचा विचारच करत नाही ही आपली खरी समस्या आहे. माझा चित्रपट हा शेतकऱ्यांना सजग करेल. शेती ही विकण्यासाठी नव्हे तर राखण्यासाठी असते असे संवाद यामध्ये आहेत. शेतकऱ्यांची मुलंबाळं पोलीस, जिल्हाधिकारी अशा पदांवर काम केलं पाहिजे. मीसुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी मुळशीचा आहे आणि तिथल्या गुन्हेगारीचा प्रश्न मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आजपर्यंत आपण केवळ आत्महत्या हा शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याचं दाखवलं आहे. आत्महत्या हे शेतकऱ्याने अनेक प्रश्नांवर काढलेलं उत्तर आहे आणि तोच तुम्ही प्रश्न म्हणून मांडत आहात. त्यांचे मूळ प्रश्न लांबच राहिले आहेत,’ असा संताप त्यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

वाचा : अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाचे शीर्षक ‘तान्हाजी’ होणार?

यावेळी त्यांनी वाळू तस्करी आणि तहसीलदारांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही प्रश्न उपस्थित केला. ‘पुढचा चित्रपट हा रेती पॅटर्न असेल. अशा प्रश्नांना मी वाचा फोडत राहणार,’ असं ते म्हणाले. प्रवीण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अभिनेता सलमान खान त्याचा हिंदी रिमेक आणणार असल्याचीही माहिती आहे.