अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं केलेले सर्व आरोप नाना पाटेकर यांनी नाकारले आहेत. ‘कोणी काय बोलायचं हे आपण कसं ठरवणार?’ असं म्हणत तनुश्रीनं केलेले सर्व आरोप नानांनी फेटाळून लावले आहेत. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं होतं, तसेच मनसेकडून त्यांनी आपल्याला धमकावल्याचा गंभीर आरोप तिनं केला होता.

दोन दिवस नाना विरुद्ध तनुश्री असा वाद चांगलाच पेटला. मात्र ‘सेटवर १०० – २०० लोक उपस्थित होते मग सर्वांसमोर मी तिच्याशी गैरवर्तणूक केलं असं ती का म्हणतेय, कोणी काय बोलायचं हे आपण कसं ठरवणार, कोणी काहीही म्हटलं तरी मला जे आयुष्यात करायचं आहे तेच मी करणार’ अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.  तनुश्रीच्या आरोपानंतर तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार की नाही या मुद्द्यावर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.

माझं नाव तनुश्री किंवा नाना पाटेकर नाही, बिग बींनी टाळलं बोलणं

नानांनी दहा वर्षांपूर्वी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. नाना पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान मला त्रास दिला. नाना इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शूटिंग संपवून मी घरी निघाले त्यावेळी माझ्या गाडीवर दगडफेक केली. कुटुंबियांना त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे गंभीर आरोप तिने या मुलाखतीत केले होते.

गणेश आचार्य एक नंबरचा खोटारडा माणूस, तनुश्री दत्ताचा पलटवार

नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच केवळ बघ्याची भूमिका निभावली असंही ती म्हणाली. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इण्डस्ट्रीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असंही ती म्हणाली.