बॉलिवूडमधील काही तारे-तारका असे आहेत ज्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण हे कटु आठवणी म्हणून लक्षात ठेवल्या जातात. यात रेखा आणि जया बच्चन यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. एकेकाळी रेखा आणि जया या फार चांगल्या मैत्रिणी होत्या. पण आता त्या दोघी एकमेकींसमोर येणे टाळतात. असे म्हटले जाते की, रेखा आणि जया बच्चन यांनी एकत्र रुमही शेअर केली होती आणि तेव्हा रेखा जया यांना दीदीभाई या नावाने हाक मारायच्या. पण या गोड नात्यात असे काही विष कालवले गेले की कालांतराने पूर्वीसारखे काहीच राहिले नाही. रिपोर्टनुसार, जया यांचे प्रियकर अमिताभ यांच्यासोबत रेखा एक सिनेमा करत होत्या. या सिनेमानंतर या तिघांचे नाते पुरते बदलून गेले. एका मुलाखतीत रेखा यांनी सांगितले होते की, अमिताभ यांच्यासोबतच्या पहिल्या मुलाखतीतच त्यांनी जादू केली होती. एका वेगळ्या पद्धतीने खुर्चीवर बसणे, त्यांची खासगी गोष्ट, मनातले भाव लोकांसमोर आणू न देणे या अमिताभ यांच्या प्रत्येक गोष्टी त्यांना आवडू लागल्या होत्या. रेखा यांनी पुढे सांगितले की, अमिताभ आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडली. त्यांनी जवळपास १० सिनेमांमध्ये एकत्र काम केले. अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या गेल्या. विवाहबाह्य प्रेमसंबंधांवर कथानक असलेल्या 'सिलसिला' या सिनेमात अमिताभ बच्चन, रेखा आणि त्यांची दीदीभाई जयाही होत्या. असे म्हटले जाते की हे कथानक त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातून प्रेरित झालेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेनिर्माते टीटो टोनी यांना अमिताभ आणि रेखा यांना त्यांच्या आगामी सिनेमात घेण्याची इच्छा होती. पण जया यांनी रेखाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा सल्ला दिला होता तेव्हा टोनी यांनी झिनत अमानला घेण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट जेव्हा रेखा यांना कळली तेव्हा त्यांनी या सिनेमात मानधन न घेता काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा निर्मात्यांनी रेखा यांनाच सिनेमात घेण्याचा निर्णय घेतला. नंतर जेव्हा सिनेमाच्या कलाकारांची घोषणा झाली तेव्हा जया यांना फार राग आला. त्या सेटवर केव्हाही यायच्या आणि अमिताभ यांना रेखापासून दूर ठेवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करायच्या. एक दिवस जया अचानक सेटवर पोहोचल्या असताना त्यांनी रेखा आणि अमिताभ यांना बोलताना पाहिले. तेव्हा जया यांना एवढा राग आला की काही विचारण्याआधीच जया यांनी रेखा यांच्या कानशिलात लगावली. यानंतर त्यांच्यातले नातेसंबंध हे बिघडतच गेले. 'कुली' सिनेमात अमिताभ बच्चन यांना झालेल्या अपघातानंतर त्यांना भेटायला पूर्ण सिनेसृष्टी आली होती, पण रेखा यांच्यासाठी मात्र त्यांना भेटण्याचे दरवाजे कायमचे बंद होते. पण रेखा यांनी अनेकदा असेही सांगितले की अमिताभ आणि त्यांच्यात मैत्रीशिवाय दुसरे कोणतेच नाते नव्हते.