करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा निर्णय घेतला. राज्यात रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) केला आहे. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता करण पटेलने सोशल मीडिया पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे. करणची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत संताप व्यक्त केला. ‘अभिनेते त्यांच्या आगामी प्रोजेक्टसचे चित्रीकरण करु शकतात. दिवस असो वा रात्र क्रिकेटर्स त्यांचे सामने खेळू शकतात. राजकिय नेते हजारो लोकांसह प्रचारसभा काढू शकतात. निवडणूका होऊ शकतात आणि तुम्ही घराबाहेर पडून मतदान कराल अशी अपेक्षा बाळगली जाते पण एक सामन्य व्यक्ती कामाला जाऊ शकत नाही’ या आशयाची पोस्ट करणनने शेअर केली. त्यासोबतच त्याने #stupid #senseless असे पुढे म्हटले आहे.

सध्या करणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ४ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात पाच एप्रिलपासून कडक नियम लागू केले असून शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा 144 कलम लागू (जमावबंदी) आहे.