आपल्या खट्याळ वागण्यामुळे चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या बॉलिवूडपेक्षा क्रिकेट विश्वात जास्त रमलेली दिसून येते. प्रितीने ‘दिल से..’ या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केल्यानंतर प्रितीने चंदेरी दुनियेतून काढता पाय घेतला. मात्र तिची नाळ अजूनही बॉलिवूडशी जोडल्याचं दिसून येतं. ज्याप्रमाणे प्रिती क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये अॅक्टीव्ह असते त्याप्रमाणेच ती सोशल मिडीयावरही अॅक्टीव्ह असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रिती सध्या एका कारणामुळे सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे.

सामान्यत: मुलीचं लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलण्याची प्रथा आहे. मात्र आता कालांतराने ही प्रथा मागे पडू लागली. तरीदेखील काही मुली हौसेने किंवा करिअरच्या दृष्टीने स्वत:च्या नावात बदल करुन घेतात. त्याप्रमाणेच प्रिती झिंटानेही तिच्या नावात बदल केला आहे. विशेष म्हणजे प्रितीने  लग्न झाल्यावर दोन वर्षानंतर नावात बदल केल्यामुळे सध्या तिची चर्चा होत आहे.

काही दिवसापूर्वी सोनम कपूरने तिच्या नावात बदल केला होता. यामुळे तिला नेटक-यांनी ट्रोलही केले होते. मात्र सोनममुळेच प्रेरित होऊन प्रितीने हा निर्णय घेतल्याची चर्चा होत होती. मात्र काही संख्याशास्त्राच्या नियमामुळे प्रितीने दोन वर्षानंतर नावात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध संख्याशास्त्रतज्ज्ञ संजय जुमानजी यांच्या सल्ल्यानुसार प्रितीने तिच्या नावापुढे तिच्या नव-याच्या नावातील पहिले अक्षर जोडले आहे.

दरम्यान, नावात बदल केल्याची माहिती प्रितीने स्वत: तिच्या ट्वीटरवरुन चाहत्यांना दिली आहे. प्रितीप्रमाणे अनेक कलाकार संख्याशास्त्रावर विश्वास ठेवत असल्याचे दिसून आले आहे. प्रितीने नावात बदल करण्यापूर्वी असेही काही कलाकार आहेत ज्यांनी संख्याशास्त्रावर विश्वास ठेऊन आपल्या आयुष्यात काही बदल केले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे आयुष्मान खुराना. आयुष्मानचे वडील स्वत: ज्योतिष असल्यामुळे त्याने त्याच्या आयुष्यात काही बदल केले आहेत. त्याप्रमाणेच एकता कपूरने देखील संख्याशास्त्रानुसार तिच्या सर्व मालिकांची नावं क या अक्षरापासून ठेवली होती. आता प्रितीनेही तिच्या नावात बदल केला आहे. त्यामुळे या बदलामुळे तिच्या आयुष्यात किती बदल होतो हे लवकरच कळेल.