पुढचं पाऊल या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील एपिसोडिक कथा एका रंजक वळणावर आली आहे. अक्का साहेब सरदेशमुख यांचा मुलगा समीर आणि रावसाहेब दांडगे पाटील यांचा मुलगा टायगर या दोघांमध्ये कुस्तीचा सामना रंगणार आहे. हा केवळ कुस्तीचाच सामना नसून दोन्ही कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे. अक्कासाहेब सरदेशमुख हे या मालिकेतील पात्र कायमच सामाजिक समस्यांवर भाष्य करत आलेले आहे. या वेळी देखील जातीवरून लग्नाला विरोध करणाऱ्या रावसाहेब यांच्या विरोधात त्यांनी विडा उचलला आहे.

रावसाहेबांच्या मुलीचे तेजूचे’ सत्यजित नावाच्या मुलावर प्रेम आहे पण जातीपातीच्या संघर्षात रावसाहेबांनी या दोघांना मारण्याचा निर्णय घेतला. पण अक्कासाहेबांनी मोठ्या हिमतीने या दोघांचे लग्न लावून, सत्यजीतला दत्तक घेऊन सरदेशमुख हे नाव दिले. पण जात प्रतिष्ठा महत्त्वाची मानणाऱ्या  रावसाहेबांनी अक्का साहेबांना कुस्तीचे आव्हान देऊन या प्रकरणाचा अंतिम निर्णय लावायचे ठरवले. अक्का साहेबांसोबत त्यांचा मुलगा समीर सुद्धा तेजू-सत्यजितच्या नात्याचं समर्थन करतो. एका मोठ्या भावाप्रमाणे तो सत्यजितला पाठीशी घालतो. त्यामुळे टायगरशी झुंज द्यायला तो स्वतःला पुढे करतो. मालिकेत हा सामना समीर आणि टायगर यांच्यात असला तरी प्रत्यक्षात हा सामना अक्का साहेब आणि राव साहेब यांच्या तत्वांमध्ये रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याचा विजेता कोण आणि त्यानंतर कथानक कुठले नवे वळण घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.