रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या करिअर आणि प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आहेत असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे आलियाच्या ‘राजी’ या चित्रपटाचं अभूतपूर्व यश तर दुसरीकडे रणबीरच्या आगामी ‘संजू’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. याशिवाय ही दोघं त्यांच्या प्रेमप्रकरणामुळेही विशेष चर्चेत आहेत. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये जळी स्थळी आलिया- रणबीरच दिसत आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत रणबीरला आवर्जून आलियाबद्दल प्रश्न विचारला जात आहे. तर रणबीरसुद्धा त्याच्या प्रेमाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. प्रेमात असणाऱ्यांना पाणीसुद्धा गोड लागतं असं म्हणतात आणि सध्या रणबीरसोबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे.

अनुपमा चोप्राला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘एखाद्याच्या प्रेमात पडणं ही जगातली सर्वांत सुंदर गोष्ट आणि सुंदर भावना आहे. प्रेमात असताना तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. इतकंच नाही तर पाणीसुद्धा गोड लागतं,’ असं तो म्हणतो.
‘स्वत:विषयीच्या गोष्टी आवडू लागतात. सकाळी उठण्यापासून ते कामाला निघेपर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा जाणवतो. प्रेमाची भावना तुमच्या आयुष्याला व्यापून टाकते,’ असं म्हणत रणबीरने त्याच्या या नव्या प्रेमाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

Photos : ‘शक्ती’ फेम रुबिना दिलैकचा शानदार विवाहसोहळा

रणबीरने यापूर्वी बऱ्याचदा त्याच्या खासागी आयुष्याचा उलगडा करणं टाळलं होतं. पण, आलियासोबतच्या नात्याविषयी मात्र तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता त्याला त्याची ‘मिस परफेक्ट’ भेटली आहे, असंच म्हणावं लागेल.