अभिनेत्रीची पडद्यावरची प्रतिमा आणि वास्तवातली प्रतिमा यांची गल्लत करू नका, असा आवाज दीपिकाने उठवल्यानंतर एकूणच इतक्या वर्षांत कुठेतरी खदखदत राहिलेला अभिनेत्रींच्या मनातला हा सल जाहीर व्यक्त झाला. मात्र, मुळात इतकी र्वष अभिनेत्री म्हणून काम करत असताना चित्रपटांमधून रंगवली जाणारी त्यांची प्रतिमा त्यांना भावलेली असते का?, या विषयावर ‘स्क्रीन बिग पिक्चर’ने राणी मुखर्जी, दिया मिर्झा आणि रविना टंडन यांना बोलतं केलं. ‘स्क्रीन बिग पिक्चर’च्या वर्धापन आवृत्तीच्या निमित्ताने अभिनेत्रींची पडद्यावरची बदलत गेलेली प्रतिमा, समाजाच्या रूढ ठोकताळ्यांपलीकडे पोहोचली आहे का? या विषयावर या तिन्ही अभिनेत्रींनी आपल्या अनुभवाचे बोल ऐकवले. ‘लागू बंधूं’च्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमाला दिलीप लागू, आसावरी लागू आणि ‘टिप टॉप प्लाझा’चे रोहितभाई शहा यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
राणी मुखर्जी म्हणते.. चित्रपट ही आता कला राहिलेली नाही, व्यवसाय झाला आहे  
आमच्या काळात चित्रपट क्षेत्र निषिद्ध मानलं जाई. हे क्षेत्र फक्त पुरुषांचं आहे आणि त्यात काम करणाऱ्या मुली चांगल्या घरातल्या नसतात, हा समज लोकांमध्ये होता. माझे वडील चित्रपट क्षेत्रामध्ये होते पण, तरीही हा समज आमच्या घरातही होताच. ‘फिल्मी’ कुटुंबातून आलेली मुले हा तेव्हा चेष्टेचा विषय होता. पण, आज चित्र बदललंय. मुळात, या क्षेत्राला मान मिळाला आहे. ‘साथिया’ चित्रपटापूर्वी मी भूमिका साकारताना फारसा विचार करत नव्हते. मी एका मागोमाग चित्रपट करीत गेले, चित्रपटातील माझ्या भूमिकेबद्दल फारसा विचार करीत नव्हते. पण ‘साथिया’ नंतर माझा दृष्टिकोन बदलला. चित्रपट हे एक सामाजिक माध्यम आहे आणि आपण साकारत असलेल्या भूमिकांमधून समाजासाठी संदेश जात असतो, याची मला जाणीव झाली. त्या वेळेला माझ्या चाहत्यांच्या पत्रांवरून मला एक गोष्ट लक्षात आली की, त्यांना माझं काम आवडत होतं. पण, मी अजूनही गंभीर, चांगल्या भूमिका कराव्यात अशी त्यांची इच्छा होती. तेव्हापासून मी चित्रपट निवडीकडे गंभीरतेने पाहू लागले. चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया शिकायला आणि अनुभवायला लागले.
   आज चित्रपट ही कला राहिलेली नसून तो एक व्यवसाय झाला आहे. शंभर कोटींच्या व्यवसायात त्याचे मोजमाप केले जाते. खूप कमी माणसे आहेत जी या पलीकडे जाऊन विचार करतात. तुमची छबी प्रत्येक शुक्रवारी येणाऱ्या चित्रपटावरून ठरली जाते. आज ‘मर्दानी’ गाजला म्हणून मला कौतुक मिळतंय, पण उद्या माझ्या नवीन चित्रपटाचे भवितव्य काय असेल आणि त्या वेळी लोकांची प्रतिक्रिया काय असेल ते कोणीच सांगू शकणार नाही. माझ्या हातात फक्त चांगलं काम करणं इतकंच आहे. आजच्या घडीला कोणीच सांगू शकत नाही की कोणत्या स्वरूपाचा चित्रपट चालेल आणि कोणता नाही? त्यामुळे चित्रपट निवडताना मी व्यावसायिक की प्रयोगशील असा भेदभाव करतच नाही. तसे करत बसले असते तर मी केलेल्यांपकी अध्रे चित्रपट माझ्या हातातून गेले असते.
  पूर्वी चित्रपट यशस्वी होण्याचे गणित त्याच्या पंचविसाव्या किंवा पन्नासाव्या आठवडय़ातील व्यवसायावर अवलंबून असे. आज हेच गणित पहिल्या तीन दिवसांमध्ये ठरतंय. त्यामुळे झालं असं की, आज नवोदित कलाकाराला चुका करायची परवानगीच नसते. तुमच्या पदार्पणापूर्वीच तुमच्या लुक्सवर, नृत्यावर, अभिनयावर काम करणारी इतकी मंडळी आहेत कारण एकाही चित्रपटात चुका करणं त्यांना परवडत नाही. तुमच्यावर फार मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केलेली असते. तुम्हाला घडवण्यावरही मेहनत घेतली जाते. त्यांची एक चूक त्यांना स्पर्धेतून बाहेर फेकून देते. आमचं तसं नव्हतं. आम्हाला चुकायची आणि त्यातून सुधारण्याची संधी त्याकाळी मिळाली होती. त्यामुळे या सर्व प्रवासात तुम्हाला तुमच्यावर विश्वास असणं महत्त्वाचं आहे. एक काळ असा येतो, जेव्हा तुम्ही खूप आत्मीयतेने काम करता पण, त्याला यश मिळत नाही. अशा वेळी स्वत:वरचा विश्वास ढळू न देणं महत्त्वाचं आहे. माझ्या वडिलांनी मला एक मंत्र दिला होता की, ‘आयुष्यात यशाने जास्त भारावून जाऊ नकोस आणि अपयशाने खचू नकोस. यश-अपयश तुझ्या आयुष्याचा एक भाग असणार आहे.’ त्यांनी दिलेला हा मंत्र मी आत्तापर्यंत पाळत आले आहे.
दिया मिर्झाच्या मते.. अभिनेत्रीला कलागुणांसाठी जोखणारा काळ आता परतला आहे
एक माणूस म्हणून आपण काय निवड करतो यावरून आपली ओळख तयार होते. एकूणच प्रसारमाध्यमे आणि समाजाने तयार केलेल्या ठोकताळ्यांमध्ये स्वत:ला अडकवून ठेवण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. एक अभिनेत्री स्वत: आई असते, प्रेयसी असते, बहीण असते. पण, कुठल्याही भूमिकेकडे पाहताना तुमच्यात दडलेल्या या नात्यांपलीकडेही तुमचं असं स्वत:चं आत काहीतरी दडलेलं असतं. त्याच्याविषयी जाणून घेण्यासारखं, ते इतरांना सांगण्यासारखं आपल्याकडे खूप काही असतं. पण, तशी ते जाणून घेण्याची संधीच आपल्याला दिली जात नाही. एक अभिनेत्री म्हणून आपण ज्याप्रकारे पहिल्या चार-पाच चित्रपटांची निवड करतो त्या आणि तशाच प्रकारच्या भूमिका ही तुमची ओळख होऊन जाते. मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली त्या वेळी तर प्रसारमाध्यमांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत जणू काही हे अलिखित नियमच तयार झाले होते. त्यामुळे एका मर्यादेनंतर पडद्यावर केवळ सुंदर दिसण्यापलीकडेही माझ्यात काही आहे हे सिद्ध करण्यासाठी मी पहिल्यांदा तसे चित्रपट नाकारण्याची सुरुवात केली.
 एका वेळेपर्यंत मी भरपूर सिनेमे करत गेले. मात्र, सिनेमानिर्मितीची प्रक्रिया अनुभवायची संधीही तेव्हा मला मिळाली नव्हती. जेव्हा दोनशेजण मिळून एक सेट उभारतात, त्यामागची प्रक्रिया काय असते? जेव्हा एखादी कथा लिहिली जाते किंवा चित्रपटामधील माझा लुक ठरवला जातो तेव्हा नक्की, काय त्यामागची विचारप्रक्रिया असते? हे मला कधीच कळलं नाही. फक्त चित्रपटामध्ये सुपरस्टार आहे आणि माझ्या वाटय़ाला चार गाणी आहेत म्हणून एखादा चित्रपट स्वीकारणे मला नकोसे झाले होते. एक अभिनेत्री म्हणून त्यात मला काहीच वाव नव्हता. त्या वेळेस मी ‘नाही’ म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्याकडे चित्रपटच येणार नाहीत, याचीही तयारी मी मनाशी केली होती. पण, त्याच वेळी माझ्याकडे ‘परिणिता’ आला. प्रदीप सरकार आणि विधू विनोद चोप्रांसोबत काम केल्यानंतर एखादा चित्रपट कसा घडतो हे मला कळू लागलं. आतापर्यंत कोणीच मला त्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं नव्हतं. एका अभिनेत्रीला जेव्हा तुम्ही सिनेमाच्या संपूर्ण प्रक्रियेत सामावून घेता तेव्हाच तिला स्वत:च्या भूमिकेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं, असं मला वाटतं. माझा हा दृष्टिकोन राजू हिराणींसारख्या मोजक्या दिग्दर्शकांच्या लक्षात आला. राजू हिराणींनी तर ‘थ्री इडियट’च्या लेखनप्रक्रियेतही मला समाविष्ट  करून घेतले होते. आज चित्रपट एका प्रकल्पाप्रमाणे बनवले जातात. एखादी भूमिका कोणी साकारावी याबद्दल वेगळे निकष तयार झाले आहेत. मल्टिप्लेक्स आल्यानंतर सिनेमानिर्मिती एका नियोजनबद्ध वातावरणात होऊ लागली आहे आणि त्याचाच फायदा आजच्या अभिनेत्रींनाही होतो आहे.
आजही पुरुषप्रधान चित्रपट पहिल्या तीन दिवसांमध्ये व्यवसाय करतात. मान्य असो वा नसो पण चित्रपट व्यवसाय पुरुष प्रेक्षकांवर अवलंबून आहे, पण आज स्त्रीप्रधान चित्रपट बनू लागले आहेत कारण गुंतवणूकदार या चित्रपटांमध्ये गुंतवणूक करायला तयार होऊ लागले आहेत. ऐंशीच्या दशकात नायिके च्या दिसण्याला महत्त्व होते. तेव्हा माधुरी दीक्षितला हुशार आणि गुणी अभिनेत्री म्हणून कोणी ओळखत नव्हते. पण, त्या आधी शबाना आझमींच्या काळात म्हणजेच सत्तरच्या दशकात त्यांना ‘गुणी’ अभिनेत्री म्हणून ओळखले जात होते. आता काळ हळूहळू बदलतो आहे. नटीला तिच्या अभिनयासाठी आणि गुणवत्तेसाठी जोखणारा तो काळ परतला आहे.
रविना टंडन म्हणते..कलात्मक सिनेमापेक्षा व्यावसायिक सिनेमाचे यश अवघड
नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारा व्यावसायिक चित्रपट करायचा की वेगळ्या धाटणीचा कलात्मक सिनेमा करायचा, हा प्रश्न मला नेहमी सतावतो. कारण, जेव्हा तुम्ही एखादा मोठा व्यावसायिक चित्रपट करता तेव्हा समीक्षकांना तो आवडत नाही पण, प्रेक्षक त्याला उचलून धरतात. आणि जेव्हा आर्ट फिल्म करता तेव्हा समीक्षकांचे कौतुक मिळाले तरी प्रेक्षक पाठ फिरवतात. माझ्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर मी पुष्कळ व्यावसायिक चित्रपट केले. लोकांनी ते डोक्यावरही घेतले. आणि एक अभिनेत्री म्हणून माझ्या आजवरच्या अनुभवातून हेच सांगेन की कलात्मक सिनेमापेक्षा व्यावसायिक सिनेमा करणे जास्त अवघड आहे. कारण, त्यात तुम्हाला कपडे, जड मेकअप, अ‍ॅक्सेसरीजचे वजन सांभाळत चित्रविचित्र नाच करायचा असतो. वास्तवात नसलेल्या गोष्टी ठसवणंच विचित्र आहे. त्यापेक्षा कलात्मक सिनेमामध्ये खऱ्या आयुष्यातील माणसं असतात. तुम्हाला केवळ तुमच्या अभिनयावर पूर्ण लक्ष देता येतं. माझ्याही आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा मी दोन पोनीटेल बांधून आणि मिनी स्कर्ट घालून नाचाचा सराव करत होते आणि स्वत:लाच विचारत होते की कारकिर्दीच्या या टप्प्यावर आपण नक्की काय करतो आहे? माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर मीच शोधलं आणि मग मी प्रयोगशील सिनेमांची वाट धरली. त्या वेळी ‘अक्स’, ‘शूल’सारखे चित्रपट माझ्या वाटय़ाला आले. पण, अशा चित्रपटांना मर्यादा आहेत. आज मला कित्येक सामाजिक विषयावरील चित्रपटांसाठी विचारले जाते, पण मी सगळ्यांनाच ‘हो’ नाही म्हणू शकत.
आजच्या काळात कलात्मक सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा हे विभाजनच काही अंशी का होईना पुसलं गेलं आहे. आज प्रेक्षक ‘मेरी कोम’, ‘भाग मिल्खा भाग’सारखे चित्रपटसुद्धा पाहतात आणि त्यामुळे त्यांचा व्यवसायही चांगला होतो आहे. या चित्रपटांना काही अंशी व्यावसायिक चित्रपटांसारखा लुक दिला जातो जी आज त्यांची गरज आहे. पण, तरीही अशा चित्रपटांच्या प्रेक्षक वर्गाबद्दल प्रश्नचिन्ह आहे. कारण, मुळात भारतीय चित्रपटांचा प्रेक्षक अजूनही पुरुषप्रधान आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा नायिकांची लग्न होत असत त्यानंतर त्यांची प्रतिमा ‘वहिनी’चीच होत असे. अशा वेळी या पुरुष प्रेक्षकाला आपल्या ‘वहिनी’ला पडद्यावर पाहणे रुचत नसे. त्यामुळे त्या काळी लग्न झाल्यावर नायिकांची चित्रपटांमधील कारकीर्द संपुष्टात आली. आता हे चित्र बदलतंय. स्त्रीची प्रतिमा, तिची शरीरयष्टी याबद्दल त्या वेळी प्रेक्षकांच्या मनात असलेल्या रूढ प्रतिमा आताशा गळून पडताना दिसत आहेत. प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये सिनेमा पाहायला जातो तेव्हा तो कथेला जास्त महत्त्व देतो आहे. त्यामुळेच एकूणच चित्र फार वेगळ्या पद्धतीने बदलत चाललं आहे.
पडद्यावरची प्रतिमा ही चारित्र्याची ओळख नाही
दीपिकाने प्रसारमाध्यमांविरोधात जो आवाज उठवला तो तिचा अधिकार आहे आणि तिने योग्य तऱ्हेने तो बजावला आहे. आपण स्त्रियांकडे ज्याप्रमाणे पाहतो त्याचेच प्रतिबिंब प्रसारमाध्यमांमध्ये उमटते. एक काळ होता जेव्हा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नटीच्या अफेअर्सची चर्चा पसरवायची हे हिट सूत्र होते. त्यात त्या अभिनेत्रीची किती बदनामी होतेय हे कोणीच पाहात नसे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आमची बाजू मांडायची संधी मिळते. तिथे कोणीच आम्हाला अडवू शकत नाही. केवळ त्या नटीची पडद्यावरची भूमिका पाहून तिच्या चारित्र्यावर भाष्य करणे हे चुकीचे आहे. कधी तरी बोल्ड भूमिका आम्हाला साकाराव्या लागतात. ही प्रत्येकाची निवड असते. मात्र, तिची पडद्यावरची प्रतिमा ही तिच्या चारित्र्याची ओळख होऊ शकत नाही.
दिया मिर्झा