सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ड्रग्सचा मुद्दा समोर आला आहे. भोजपूरी सुपरस्टार व भाजपाचे खासदार रवी किशन यांनी ड्रग्सचा मुद्दा संसदेत मांडला. बॉलिवूडमधील ड्रग तस्करीची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली. दरम्यान या वादात आता अभिनेता रणवीर शौरी याने उडी मारली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याने जया बच्चन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत बॉलिवूडधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे.

“ज्या थाळीत खातात त्याच थाळीत भोकं पाडतात”, असं म्हणत जया बच्चन यांनी बॉलिवूडवर टीका करणाऱ्या कलाकारांविरोधात संताप व्यक्त केला होता. त्यांच्या या टीकेला अभिनेता रणवीर शौरी याने प्रत्युत्तर दिलं आहे. “ही मंडळी केवळ आपल्या मुलांसाठी थाळ्या सजवतात. आम्हाला फेकलेले तुकडे खायला देतात. आम्ही आमचा डबा स्वत: घेऊन कामावर जातो. आम्हाला कोणी काही दिलेलं नाही. जे आहे ते आमचं आहे. यांना शक्य झालं असतं तर उरलेलं सर्व काही यांनी आमच्याकडून हिसकावून घेतलं असतं.” अशा आशयाचं ट्विट करुन रणवीर शौरी याने संताप व्यक्त केला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.”