अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना त्याची कथित गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्तीने कुटुंबीयांसोबत गुपचूप पलायन केल्याची चर्चा होती. मात्र रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी या चर्चा अफवा असल्याचं म्हटलं आहे. पोलीस जेव्हा रियाला बोलावतात तेव्हा ती त्यांना तपासात सहकार्य करत आहे, अशी माहिती मानशिंदे यांनी ‘ई टाइम्स’ला बोलताना दिली.

रियाला बिहार पोलिसांकडून कोणत्याच प्रकारची नोटीस किंवा समन्स मिळाले नसल्याचंही मानशिंदे यांनी सांगितलं. “रिया गायब असल्याची चर्चा खोटी आहे. मुंबई पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांना तिने पूर्ण सहकार्य केलं आहे. बिहार पोलिसांकडून तिला कोणत्याच प्रकारची नोटीस किंवा समन्स मिळाले नाहीत. या खटल्याची चौकशी करण्याचा त्यांना अधिका नाही. रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तिने या खटल्याची मुंबईत बदली करण्याची मागणी केली आहे. हा खटला न्यायप्रविष्ट आहे”, असं ते म्हणाले.

शनिवारी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी माध्यमांना मुलाखत दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “जर रिया स्वत:ला दोषी मानत नाही तर तिने पोलिसांसोबत लपाछपीचा खेळ थांबवावा आणि समोर येऊन जबाब नोंदवावा.”

आणखी वाचा : सुशांतच्या एक्स मॅनेजरच्या पार्टीत राजकीय नेते उपस्थित होते का? मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले..

३१ जुलै रोजी रियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. मात्र त्यानंतर ती कुठे आहे, याची माहिती समोर आलेली नाही. ”दोन-तीन दिवसापूर्वीच रिया मध्यरात्री तिच्या कुटुंबीयांसोबत घर सोडून गेली. यावेळी त्यांच्याकडे मोठ-मोठ्या बॅग्सदेखील होत्या. ते एका निळ्या रंगाच्या गाडीतून निघून गेले”, अशी माहिती रिया ज्या इमारतीत राहते त्याच्या मॅनेजरने बिहार पोलिसांना.

सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. यात रियाने पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे.