बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक, निर्माते संजय भन्साळी यांचे चित्रपट आणि त्यात रणवीर सिंगची मुख्य भूमिका हे समीकरण जवळपास ठरलेलंच आहे. रणवीरनं भन्साळींच्या तीन चित्रपटात महत्त्वाची भूमिक साकारली अन् या तिन्ही चित्रपटांनी भन्साळींच्या पदरात भरघोस यश दिलं. त्यामुळे संजय भन्साळींच्या चित्रपटात पुढेही रणवीर दिसणार हे अनेकांनी जणू गृहितच धरलं आहे. रणवीरसोबत तीन दमदार चित्रपट केल्यानंतर संजय भन्साळी यांनी आता पुढील चित्रपटासाठी सलमानचं नाव निश्चित केल्याचं समजत आहे.

बॉलिवूडमधल्या काही खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच भन्साळी आणि सलमान खान यांच्यामध्ये चित्रपटाच्या कथानकावरून चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे सलमाननंही होकार भरला आहे. सलमानचा ‘रेस ३’ हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. याव्यतिरिक्त सलमान ‘भारत’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त ‘किक २’, रेमो डिसूजाचा चित्रपट आणि ‘दबंग ३’ असेही चित्रपट सलमानच्या पदरात आहे. त्यामुळे या चारही चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी सलमानकडे वेळ अपुरा आहे. पण असं असलं तरी बॉलिवूडमधल्या ब़ड्या दिग्दर्शकाला नाराज न करता सलमानं होकार भरला आहे.

त्यामुळे आता ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी सलमान आणि संजय भन्साळी एकत्र येणार आहेत. सलमानला सोबत घेऊन भन्साळींना बाजीराव मस्तानी हा चित्रपट करायचा होता. विशेष म्हणजे यासाठी सलमानसोबत ऐश्वर्या आणि राणी मुखर्जी ही दोन नावंही त्यांनी निश्चित केली होती. पण, सलमानला सोबत घेऊन बाजीराव मस्तानी हा चित्रपट करण्याचं भन्साळींचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे आता बऱ्याच वर्षांनी सलमान भन्साळींच्या चित्रपटात काम करणार असल्यानं सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचबरोबर हृतिक रोशनसोबतही एक चित्रपट भन्साळी करणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.