निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा वेगळा असा एक चाहता वर्ग आहे. कौटुंबिक मुल्यं जपत, त्यातूनच एखादी प्रेमकहाणी फुलवत कथानकाला वेगळी वळणं देत चित्रपट साकारणाऱ्या करणच्या कलाकृतींना प्रेक्षकांनी बऱ्याचदा भरभरुन प्रेम दिलं आहे. त्याच्या अशाच काही गाजलेल्या चित्रपटांपैकी एक नाव म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’. करणच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट आजही अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर आणि इतरही कलाकारांचा सहभाग असणाऱ्या या चित्रपटाची जादू काही औरच.

अशा या लोकप्रिय चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, येत्या काळात ‘डेली सोप क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर या चित्रपटाला मालिकेच्या रुपात सादर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांचा हवाला देत ‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘रोडिज’, ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिअॅलिटी शोमधील एखाद्या स्पर्धकाची एकताच्या नव्या शोसाठी वर्णी लागू शकते. सध्याच्या घडीला तिच्या या प्रोजेक्टसाठी ‘रोडिज’ फेम वरुण सूदच्या नावाची चर्चा आहे.

हृतिक रोशनने साकारलेल्या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात येण्याच्या चर्चा आहेत. त्याशिवाय एकता इतर कलाकारांच्याही शोधात असल्याचं कळत आहे. बिग बी आणि शाहरुख खानने साकारलेल्या भूमिकांसाठी आता ती कोणाची निवड करते हे पाहणंसुद्धा फार औत्सुक्याचं ठरणार आहे. सोनी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रदर्शित केला जाणार असून, आता प्रेक्षकांमध्येही या शोविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

एकताच्या शोमध्ये वर्णी लागल्यास ही बाब वरुणच्या कारकिर्दीच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरु शकते. सध्याच्या घडीला तरुणाईमध्ये वरुणची लोकप्रियता पाहता या कार्यक्रमालाही त्याच्या लोकप्रियतेचा फायदा होईल असं म्हणायला हरकत नाही.