आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे अदनान सामी. नुकताच अदनानचा ‘तू याद आया’ हा अल्बम प्रदर्शित झाला आहे. या अल्बमच्या प्रमोशनसाठी त्याने एका वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

अदनानने अलिकडेच ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तानविषयी भूमिका मांडली. काश्मीर प्रश्न सोडवला, तर पाकिस्तानी लष्कराला पैसे मिळण्याचा मार्ग बंद होईल, असं म्हणत त्यांनं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. ‘काश्मिरसारख्या मुद्द्यांवरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणाव असतो. दोन्ही देशांमध्ये शांतता का नाही? या प्रश्नाचे उत्तर गेल्या ६० ते ७० वर्षांपासून शोधले जात आहे. ज्याचे उत्तर लष्करामध्ये लपलेले आहे. खासकरुन पाकिस्तानी लष्करामध्ये आहे. कारण त्यांना काश्मिरच्या मुद्यासाठी पैसा मिळतो’ असं अदनान म्हणाला.

‘ज्या दिवशी काश्मीर मुद्दा सोडवण्यात येईल. त्या दिवशी त्यांचे फंडिंग बंद होईल. जर तुम्ही काश्मिरमध्ये घडलेल्या घटनांचा विचार केला, तर जेव्हा जेव्हा दोन्ही देशांनी शांततेचा विचार केला तेव्हा कुठे तरी ते थांबण्याचे प्रयत्न झाले आहेत. कधी कारगिलचे युद्ध झाले आहे. तर कधी पुलवामाचा हल्ला. असे का होते? यामागे एकच कारण आहे की पाकिस्तनी लष्कराला काश्मीर मुद्दा सतत चर्चेत ठेवायचा आहे’ असं अदनानं सांगितलं.