करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन घोषित केला आहे. आजपासून (१८ मे) देशात लॉकडाउनच्या चौथा टप्पा सुरु झाला आहे. मात्र या लॉकडाउनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसंच परराज्यातून आलेल्या मजुरांचे अनेक हाल होत आहेत. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. त्यासोबतच अभिनेता सोनू सूददेखील या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करत आहे. नुकतंच त्याने मुंबईत काम करणाऱ्या कर्नाटकमधील मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर आता त्याने बिहार आणि झारखंडमधील मजुरांना गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

‘इंडिया.कॉम’नुसार, कर्नाटकमधील मजुरांना त्यांच्या गावी पाठविल्यानंतर सोनू सूदने उत्तर प्रदेशमधील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. त्याने मुंबईत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील मजुरांसाठी मुंबईतून बस पाठविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्याने कायदेशीर परवानगीदेखील मिळविली आहे.

वाचा : ‘…तोपर्यंत ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाही’; स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सोनू सूदचं आवाहन

आतापर्यंत मुंबईतील वडाळा येथून लखनौ, हरदोई, प्रतापढ आणि सिद्धार्थनगर यांसह बिहार, झारखंडसाठी बस रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध स्तरांमधून जनता सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

दरम्यान, देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून सोनू सतत विविध मार्गाने गरजुंची मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक गरजुंच्या जेवणाची सोय केली आहे. तसंच त्याचे काही हॉटेल्सदेखील डॉक्टर, नर्स यांच्यासाठी खुले केले आहेत. तसंच रमजानचा महिना सुरु असल्यामुळे अनेक गरजुंच्या घरी तो जेवणाची पाकिटंही देत आहे.