एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय लिहिण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून भविष्यात ‘बाहुबली २’चे नाव घेतले जाईल. पण, एकवेळ अशी होती जेव्हा बाहुबली म्हणजेच प्रभास पैसे कसे कमवायचे या चिंतेत होता. त्याचं बाहुबलीचं मानधन थकलं होतं आणि पुढची पाच वर्षे तो एकही चित्रपट हाती घेणार नव्हता. त्यामुळे त्याचे खिसे पूर्णपणे रिकामे होण्याच्या मार्गावर होते. प्रभासबद्दलच्या अशाच काही गोष्टींचा खुलासा राजामौली यांनी एका मुलाखतीत केला.’

बाहुबली’ चित्रपट केवळ प्रभासमुळेच बनला असल्याचे सांगताना राजमौली बऱ्याचदा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभासने बाहुबलीच्या दोन्ही चित्रपटांसाठी अथक प्रयत्न केले असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण, राजामौली यांनी मुलाखतीत प्रभासबद्दल जे काही सांगितले ते वाचून नक्कीच त्याच्या चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेम द्विगुणीत होईल. राजमौली म्हणाले की, ‘प्रभासने लागोपाठ तीन हिट चित्रपट दिले होते. त्यामुळे त्याला साइन करण्यासाठी निर्माते मोठी रक्कम मोजायला तयार होते. पण, त्याने कोणतीही दुसरी ऑफर न घेता केवळ बाहुबलीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. इतकंच नाही तर त्याने मॅनेजरला निर्मात्यांकडून पैशाची कोणतीही अवाजवी मागणी न करता ते देतील तितकंच मानधन घेण्याची सूचना दिली होती.’

पैशांच्या चणचणीमुळे प्रभास त्यावेळी तणावात होता. निर्माते रोख रक्कम आणि धनादेश घेऊन त्याच्या घराच्या चकरा मारत होते आणि त्या मोबदल्यात ते त्याच्याकडून कशाचीच अपेक्षाही करत नव्हते. यामुळे प्रभास खूप घाबरला आणि त्याने मला फोन केला. तेव्हा मी त्याला कोर्टातून रितसर कागदपत्र बनवून घ्यायला सांगितले. या पैशाचा आणि माझ्या कामाचा काहीही संबंध नाही असे त्या कागदपत्रांवर नमूद करण्यास मी त्याला म्हणालो. पण, जर भविष्यात ही लोक माझ्याकडे पैसे मागण्यासाठी परत आली तर मी इतकी मोठी रक्कम परत कशी करणार असे म्हणत त्याने कागदपत्र बनवण्यास नकार दिला. त्याला १० कोटी रुपयांची जाहिरात करण्याची ऑफरही आली होती. त्याने तीसुद्धा नाकारली. प्रभासला खोटं बोलता येत नाही. तो कधीच कुणाच्याही भावना दुखावत नाही. कोणालाही दुखावलेलं त्याच्याने बघवत नाही, असेही राजामौली यांनी प्रभासबद्दल सांगितले.