‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत आला आहे. विकीच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. चित्रपटाच्या यशानंतर त्याचा समावेश बॉलिवूडमधल्या लोकप्रिय दहा अभिनेत्यांच्या यादीतही झाला आहे. मात्र यशाची हवा आता त्याच्या डोक्यात जाऊ लागली आहे म्हणूनच त्यानं स्वत:कडे लक्ष देणं खूप गरजेच आहे असा टोमणा दिग्दर्शकानं लगावला आहे.

नाव न छापण्याच्या अटीवरून बॉलिवूडमधल्या दिग्दर्शकानं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं विकीच्या बदलत चाललेल्या स्वभावावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘चित्रपटाच्या यशाची हवा त्याच्या डोक्यात गेली आहे. विकीनं स्वत:च्या मानधनात वाढ केली आहे आता त्याला चित्रपटात घेणं खिशाला न परवडण्यासारखं झालं आहे. हल्ली तो करण जोहरच्या कंपूमध्ये जास्त दिसू लागला आहे. कदाचित हा कंपू त्याला आयुष्यात पुढे कसं जायचं यावर मार्गदर्शन करत असेल. ही खरं तर चांगली गोष्ट आहे, यश त्याच्याही पदरात पडलं पाहिजे मात्र त्यानं स्वत:चा दृष्टीकोनच बदलला आहे.’ अशी नाराजी दिग्दर्शकानं बोलून दाखवली आहे.

विकीचं त्याची प्रेयसी हरलीनसोबत झालेल्या ब्रेकअपबद्दलही दिग्दर्शकानं आपलं मत मांडलं आहे. ‘विकीला आता कतरिना कैफ, आलिया भट्टला डेट करावसं वाटत आहे . तो अतिशय वेगानं यशाच्या पायऱ्या चढत आहे पण यामुळे त्याला पायाखालची जमीनही दिसेनाशी झालीये’, असं म्हणत दिग्दर्शकांने त्याला स्वत:कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.