‘स्टॅण्डअप कॉमेडी’ हा प्रकार भारतीय वाहिन्यांना माहीतही नव्हता. त्या वेळी अशा प्रकारचे काही शोज् करणाऱ्या विनोदी अभिनेत्यांमध्ये सुरेश मेनन हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आता पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारचा विनोदी शो घेऊन सब टीव्हीवर परतलेल्या सुरेश मेनन यांच्या मते हिंदी चित्रपटसृष्टीने विनोदी अभिनेत्यांना बाजूला सारले आहे. चित्रपटांचे नायकच आता कॉमेडी करू लागले असल्याने विनोदी कलावंतांना साहाय्यक भूमिकांपुरतेच मर्यादित राहावे लागते, अशी खंत मेनन यांनी व्यक्त केली. काल्पनिक विनोदी मालिका, शो अशा प्रकारे एक पूर्ण वाहिनी म्हणून सब टीव्ही ही वाहिनी तयार झाली. सगळे गाजलेले स्टॅण्डअप कॉमेडियनचा एकत्रित नवीन शो ‘‘हँसी है हँसी मिल तो ले’ हा सब टीव्हीवर सुरू होणार आहे. त्या शोच्या निमित्ताने बोलताना विनोदी कार्यक्रम हे आजही लोकांसाठी खूप गरजेचे आहेत. एकीकडे कामाची धावपळ, कामाच्या प्रचंड ताणाने भरलेले आयुष्य, याहीपेक्षा भारत क्रिकेटचा सामना हरतो तेव्हा येणारा ताण अशा प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींत लोकांना विनोदाची मात्रा हवी असते. त्यामुळे सब टीव्हीसारख्या विनोदाला वाहिलेल्या पूर्ण वाहिनीने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मात्र मालिका सोडून बॉलीवूडची वाट धरलेल्या मेनन यांना आता हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी कलाकारांना तितका वाव दिला जात नाही असे वाटते. सध्या हिंदी चित्रपटांमध्ये नायकालाच विनोदी भूमिका देण्याचा अट्टहास निर्माता-दिग्दर्शकांकडून केला जातो. मात्र चित्रपटाच्या नायकाला साहाय्यक म्हणून विनोदी कलाकारांचा उपयोग करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. आज मात्र स्टॅण्डअप कॉमेडीला लोकांनी उचलून धरले आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेडी शोज् लोकांसमोर येत आहेत, असे मेनन म्हणाले.